मुंबई – भारताच्या शेजारी असलेल्या श्रीलंकेत मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिंसा सुरू आहे. श्रीलंकेत आणीबाणी जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात जनभोक्ष उसळला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरू केलं. यात एका खासदाराला आपला जीव गमवावा लागला. तर श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान अज्ञात स्थळी स्थलांतरीत झाले. यावरून भारतावरही तशी स्थिती येईल अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तसा इशारा दिला आहे. वादग्रस्त विषय दूर ठेवा, नाहीतर श्रीलंकेत ज्या प्रमाणात राष्ट्रपती आणि पंतप्रधान पळून गेले तशी स्थिती भारतात येईल, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला. राऊत यांच्या विधानाने महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.
श्रीलंकेत हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाने लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांना दिले आहेत. सार्वजनिक मालमत्तेची लूट करणारे आणि इतरांच्या जीवास धोका निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्यांवर गोळ्या झाडाव्यात, असे आदेश संरक्षण मंत्रालयाने दिले आहेत.
राजकीय धोरणं चुकल्यामुळे श्रीलंकेवर अशी स्थिती निर्माण झाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. तसेच सत्ताधाऱ्यांनी श्रीलंकेत अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्यांक असा वाद सुरू केल्याचा हा परिणाम असल्याचं विश्लेषक म्हणतात. वास्तविक पाहता, आर्थिक आघाडीवर श्रीलंका सरकार अपयशी ठरल्यामुळे देशात जनभोक्ष उसळला आहे. हाच धागा पकडून संजय राऊत यांनी मोदी सरकारला इशारा दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.