कळंत्रेवाडी ग्रामस्थांची वनाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी
उंब्रज – गेल्या काही दिवसांपासून कळंत्रेवाडी व नजीकच्या पुनर्वसन नाणेगांव परिसरात बिबट्याची दहशत सुरू झाली असून कळंत्रेवाडीसह परीसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी वनविभागाने याठिकाणी तातडीने सापळा लावावा, अशी मागणी कळंत्रेवाडी ग्रामस्थांनी कराडचे वनाधिकारी डॉ. अजीत साजणे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या काही वर्षापासून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य मानवी वस्तीत वाढले आहे. दोन दिवसापासून कळंत्रेवाडी व नजीकच्या पुनर्वसन नाणेगाव येथेही बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. दोन दिवसांत बिबट्याच्या हल्यात पाळीव दोन कुत्री मृत्युमुखी पडले आहेत. तसेच गावानजीकच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे उमटले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी याठिकाणी वनविभागाने तातडीने सापळा लावावा, अशीही मागणी पोलिस पाटील जयसिंग येळवे, राहुल बाकले, अरविंद यादव, लक्ष्मण बाकले यांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
उरूल घाटात प्रवाशांना बिबट्याचे वारंवार होणारे दर्शन असो की गत आठवड्यात माजगाव येथे कुत्र्यावर बिबट्याने केलेला हल्ला असो यावरुन बिबट्याचे मानवी वस्तीत वास्तव्य वाढल्याचे दिसून येत आहे. पंधरा दिवसापूर्वी माजगाव येथे घराच्या अंगणात कॉटला बांधलेल्या कुत्र्यावर तर दोनच दिवसांपूर्वी रेडकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटनाही ताजीच आहे. यामुळे या परिसरात बिबट्याच्या भीतीने शेतकरी, मजूर शेतात जाण्याचे धाडसही करीत नाहीत.