मुंबई : कोकणात गणेशोत्सवासाठी निघालेल्या गणेश भक्तांवर काळाचा घाला घातला. पोलादपूरजवळ कार आणि बस यांच्यात भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
अंबरनाथच्या आनंद पार्क परिसरात जयवंत सावंत हे त्यांच्या कुटुंबासह वास्तव्याला होते. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी गणेशोत्सवासाठी जात असताना हा अपघात झाला. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सावंत कुटुंब अंबरनाथहून रवाना झाले आणि काही तासातच पोलादपूरजवळ त्यांच्या एर्टीगा कारची शिवशाही बससोबत जोराची धडक झाली. या अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. पोलीस आणि स्थानिकांनी जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात कारमधील जयवंत सावंत , किरण घागे या दोघांचा मृत्यू झाला. तर गिरीश सावंत, जयश्री सावंत आणि अमित भीतळे हे तिघे जखमी झाले आहेत. या सर्वांना आधी नजिकच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कामोठे इथल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे सध्या तिन्ही जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.