जयपूर – गेल्या काही दिवसांपासून राजस्थानात रंगलेल्या राजकीय नाट्याला आज एक नवं वळण मिळालं. बसपाच्या तिकिटावर विधानसभा जिंकून नंतर काँग्रेसमध्ये सामील झालेल्या सहा आमदारांना व राजस्थान विधानसभा अध्यक्षांना आज राजस्थान उच्च न्यायालयाने नोटीस बजावले आहे.
तत्पूर्वी, बसपा आमदारांचा काँग्रेस प्रवेश पक्षबंदी कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याची तक्रार भाजप आमदार मदन दिलावर यांनी विधानसभा अध्यक्ष सी पी जोशी यांचेकडे केली होती. मात्र जोशी यांनी ही तक्रार फेटाळून लावली.
यानंतर भाजप आमदार दिलावर यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याप्रकरणी याचिका दाखल केली. दिलावर यांच्यानंतर बसपाकडूनही याचिका दाखल करण्यात आली असून याबाबत आज राजस्थान उच्च न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात आली.
यावेळी न्यायाधीशांनी, राज्याचे विधानसभा अध्यक्ष सी पी जोशी व बसपा आमदार संदीप यादव, वाजिब अली, दीपचंद खेरिया, लखन मीणा, जोगेंद्र अवाना आणि राजेंद्र गुधा यांना नोटीस धाडले आहे. नोटिसींना उत्तर देण्यासाठी त्यांना ११ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.