बचतगटांचे महत्त्व सध्या वाढलेले दिसते. बचतगटांच्या माध्यमातून शेकडो, हजारो महिलांना रोजगाराची संधी मिळत आहे. छोट्या उद्योगांची उभारणी होत आहे. कर्जपुरवठा केला जात आहे. यातूनच महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत आहेत. त्यामुळे आज हजारोंच्या संख्येने बचतगटांची स्थापना होत आहे. याच बचतगटांच्या माध्यमातून हजारो महिलांना एकत्र आणत त्यांना कर्जपुरवठा, लहान-सहन उद्योग सुरु करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून आत्मनिर्भर बनविण्याचे मोलाचे नगरसेविका पौर्णिमा सोनावणे यांनी केले आहे. बचतगटाच्या माध्यमातून हजारो महिलांच्या संसाराची चाके मजबूत करून त्यांना आर्थिक सक्षम करणाऱ्या पौर्णिमाताईंचे कार्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या पौर्णिमाताईंना सामान्य महिलांना घराबाहेर पडल्यानंतर काय अडचणी येतात, याची पुरेपूर जाणीव होती. नगरसेविका म्हणून कारकिर्द सुरू होण्याअगोदर त्या महिलांचे संघटन आणि महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होत्या. नगरसेविका झाल्यानंतरही त्यांनी सर्वसामान्य लोकांशी असलेले त्यांची नाळ तुटू दिली नाही. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्राधान्यांने प्रयत्न करीत असतात. महिला राजकारणी म्हणून काम करीत असताना महिलांच्या अडी-अडचणी तसेच त्यांच्या समस्या सोडवण्याची संधी प्रत्येक राजकारणी महिलेला मिळत असते. याच संधीचे सोने करीत पौर्णिमाताईंनी आजवर हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मदत केली आहे. त्यांच्या या मदतीमुळे आज हजारो महिलांना त्यांचा संसाराचा गाड्याची चाके मजबूत करता झाली आहेत.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पौर्णिमाताई या सातत्याने प्रयत्न करीत असतात. मात्र या कामाशिवाय त्यांनी आजपर्यंत हजारो महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. महापालिका तसेच शासनाच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहचवून गरजु महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पौर्णिमाताईंचे प्रयत्न असतात. मागील आठ वर्षाच्या काळात त्यांनी हजारो महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. या कामामुळेच गरजू महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणारी नगरसेविका अशी पौर्णिमाताईंची ओळख बनली आहे.
बचतगट हे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे महत्वाचे साधन आहे. त्यामुळेच पौर्णिमा सोनवणे यांनी ताथवडे व परिसरातील हजारो महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. त्यांनी मागील आठ वर्षाच्या काळात हजारो महिलांना एकत्र आणून 100 ते 150 महिला बचत गटाची स्थापना केली आहे. आज या सर्व बचत गटामधून लाखो रुपयांचे व्यवहार होत आहेत. बचत गटाद्वारे बचत केलेली रक्कम आणि त्यातून येत असलेले व्याज यामुळे महिलांना या पैशाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होवू लागला आहे. बचत गटाचे जाळे निर्माण केल्यामुळे पौर्णिमाताईंचा हजारो महिलांशी संपर्क झालेला आहे. आपल्या याच संपर्काचा उपयोग त्यांनी नगरसेविका झाल्यानंतर महापालिकेच्या विविध योजना गरजू महिलांपर्यंत पोहचवण्यासाठी केला. महापालिकेच्या योजना महिलापर्यंत पोहचवून त्याचा हजारो महिलांना फायदा मिळवून दिला आहे.
महापालिकेबरोबरच राज्य शासनाच्या योजना तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाकडूनही त्यांनी महिलांना कर्ज मिळवून दिले आहे. तसेच विधवा महिलांना पेन्शन मिळवून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहे. पुढील काळातही महिलांच्या विविध प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून काम करणार असून विविध शासकीय योजनांचा महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी आपण तत्पर राहणार असल्याचे पोर्णिमाताई सांगतात. त्यांनी केलेले काम वरकरणी जरी लहान दिसत असले तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ मोठ्या प्रमाणात हजारो महिलांना झालेला आहे, हे मात्र खरे !