मुंबई – गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत पंजाबने विजय मिळवला. अर्थात या विजयामुळे स्पर्धेत रंगत निर्माण झाली आहे. आता तळातील मुंबई इंडियन्स वगळता पंजाबसह चेन्नई सुपर किंग्ज व कोलकाता नाईट रायडर्स या संघांनाही आता प्लेऑफ गाठण्याचा विश्वास वाटू लागला आहे. जर या संघांनी आपापले पुढील सामने जिंकले तर या तीनही संघांना ही फेरी गाठण्याची संधी मिळेल.
गुजरातचा संघ 16 गुणांसह आधीच प्लेऑफमध्ये दाखल झाला असून ज्या संघांचे 8 गुण आहेत त्यांना त्यांचे पुढील चारही सामने जिंकून 16 गुण नोंदवता येणार आहे. असे झाले तर सरस धावगतीच्या आधारे संघांची पात्रता ठरवली जाईल. रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाने सुरुवातीचे सामने गमावल्यावरही जिद्द सोडली नाही व आगामी सामन्यांतील विजयाच्या जोरावर बाद फेरीची दावेदारी कायम राखली आहे.
जे चित्र बेंगळुरूचे आहे तेच चेन्नईबाबतही घडू शकते. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईला सुरुवातीच्या सामन्यांत सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, अखेर त्याने नेतृत्व पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीकडे सोपवले व त्याच लढतीत चेन्नईने विजय प्राप्त केला. इतकेच नाही तर आता त्यांचे नऊ सामने झाले असून अद्याप पाच सामने बाकी आहेत. त्यांनी सहा पराभव व तीन विजयांसह 6 गुणांची नोंद केली असून उरलेले पाचही सामने जिंकले तर चेन्नईचा संघही प्लेऑफमध्ये दाखल होऊ शकतो.
तसेच बेंगळुरूलाही संधी आहेच. त्यांनीही पुढील सामने जिंकले तर त्यांचेही स्थान वधारेल व त्यावेळी प्लेऑफमध्ये कोणते संघ पात्र ठरतील हे सरस धावगतीवर ठरेल. तसेच जर चारही संघांचे गुण समान राहिले तर मात्र, त्यांनी साखळीत किती सामने जिंकले त्यावरून चित्र स्पष्ट होणार आहे.