नवी दिल्ली – मार्च 31 अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत पंजाब नॅशनल बॅंकेचा (पीएनबी)स्टॅंड अलोन तोटा कमी होऊन 697 कोटी रुपये झाला असल्याचे बॅंकेने म्हटले आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेला 4750 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक एस. एस. मल्लिकार्जुन राव यांनी सांगितले की, या आर्थिक वर्षात बॅंकेने 10 हजार कोटी रुपयांची कर्जवसुली करण्यात यश मिळविले. त्याचबरोबर कडक उपाययोजना केल्यामुळे 20 हजार कोटींचे एनपीए कमी करण्यात यश मिळाले आहे. यावर्षी बॅंकेला 8 हजार कोटी रुपयांच्या कर्जवसुली होण्याची अपेक्षा आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे या आर्थिक वर्षातील पहिल्या दोन तिमाही फारशा आशादायी नाहीत.
तिसऱ्या तिमाहीपासून बॅंकेचे कामकाज पूर्णक्षमतेने सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. या तिमाहीत ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 14.21 टक्के आहे. गेल्या वर्षी ही अनुत्पादक मालमत्ता 15.50 टक्के होती. त्याचबरोबर निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 6.56 टक्क्यांवरून 5.77 टक्के इतकी कमी झाली आहे. ही आगामी काळात आणखी कमी होणार आहे. त्यामुळे तरतूद कमी करावी लागेल.