चंदिगड – केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू केलेल्य देशव्यपी “चक्का जाम’ आंदोलनाचा भाग म्हणून पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी आज अनेक ठिकाणी “रास्ता रोको’ आंदोलन केले. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दुपारी 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत “चक्का जाम’ आंदोलन पुकारले होते.
वेगवेगळ्या संघटनांशी संबंधित शेतकऱ्यांनी कृषी कायद्याचा निषेध करत अनेक ठिकाणी राज्य व राष्ट्रीय महामार्ग रोखले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणची वाहतुक पर्यायी मार्गांनी वळवली होती. तरिही महामार्गांवरील वाहतुकीचा अनेक ठिकाणी खोळंबा झाला.
केंद्रातील भाजपच्या सरकारने “काळा कायदा’ आणला असून या कायद्यांमुळे शेती उद्योगच नष्ट होईल, आणि केवळ मोठ्या उद्योगांनाच फायदा होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
पंजाबमधील शेतमाल वाहतुकीच्या रेल्वे रद्द करण्यात आल्याने कोळसा, खते आणि अन्य आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होईल अशी टीकाही पंजाबमधील शेतकऱ्यांच्या संघटनांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने काही ठिकाणची मालवाहतुक करणारी रेल्वेसेवा स्थगित केली आहे.
पंजाबमधील संगरूर, बठिंडा, मानसा, बरनाला, पटियाला, लुधियाना आदी एकूण 35 ठिकाणी “रास्ता रोको’ करण्यात आले, अशी माहिती भारतीय किसान युनियनचे सरचिटणीस सुखदेव सिंग कोक्रिकालन यांनी दिली. तर 45 ठिकाणी असे आंदोलन केले गेल्याचे किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सरवान सिंग पंधेर यांनी सांगितले.
हरियाणामध्ये कमल, रोहतक, कैथल, जिंद, हिसार आणि फतेहबादसह 20 ठिकाणी आंदोलन करण्याचे नियोजन होते असे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुमनाम सिंग म्हणाले.