चंदीगड – कर्तारपुर कॉरिडॉर मधून पाकिस्तानात जाणाऱ्या भाविकांच्या अनुषंगाने पंजाबचे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी माफी मागितली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी विधानसभेत ही माहिती दिली. अनेकांच्या हातून चुका होतात तशी चूक त्यांच्या हातून झाली आहे पण आता त्यांनी माफी मागितल्यामुळे या विषयावर पडदा पडला आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानची आयएसआय ही एजन्सी पंजाबात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे त्याबद्दलही आपण जागरूक राहिले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
पोलिस महासंचालक गुप्ता यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की कर्तारपुर कॉरीडॉर मधून सकाळी आपण एकाला पाकिस्तानात सोडले तर संध्याकाळी तो प्रशिक्षित अतिरेकी बनून भारतात परत येऊ शकतो. तेथे तुम्ही सहा तास असता. तेवढ्या अवधीत तुम्हाला फायरिंग रेंज मध्ये नेऊन फायरिंगचे किंवा आयईडी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते असे विधान त्यांनी केले होते.
कर्तारपुर कॉरिडॉर मधून येणाऱ्या भाविकांना भुलवून त्यांना भारताच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न पाकिस्तानातील काही घटक करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला होता. त्यांच्या या विधानावरून पंजाबात मोठेच वादळ उठले होते. विरोधकांनी हा विषय लाऊन धरला होंता.