बंगलुरू – न्यायालयाच्या बेअदबीबद्दल प्रशांत भूषण यांना कोर्टाने ठोठावलेली शिक्षा अनावश्यक आहे अशी प्रतिक्रिया माजी विधीमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की भूषण यांनी न्यायाधीशांवर आरोप ठेवले होते व त्या प्रकरणात न्यायाधीशांनीच निकाल देणे योग्य नव्हते, त्या ऐवजी हा विषय बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे सोपवायला हवा होता. भूषण यांना केवळ एक रूपया दंडाची प्रतिकात्मक शिक्षा झाली असली तरी न्यायालयाच्या उच्च दर्जाच्या कार्यपद्धतीला साजेसा हा निर्णय नव्हता, हा निर्णय नैसर्गिक न्याय पद्धतीनेही झालेला नाही असे त्यांनी म्हटले आहे.
आज पीटीआयशी या प्रकरणात प्रतिक्रिया देताना मोईली यांनी म्हटले आहे की भविष्यात अशा प्रकारच्या खटल्यांचा निकाल देताना कोर्टाने काहीं मार्गदर्शक तत्वे निश्चीत करण्याची गरज होती.
सर्वसाधारणपणे अशी प्रकरणे बार कौन्सिलकडे सुपूर्त केली जातात. याही प्रकरणात तसेच व्हायला हवे होते असेही त्यांनी म्हटले आहे.