सिंहगडरस्ता, दि. 20 (प्रतिनिधी) – नवले पुलाखाली वडगावकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याची सध्या पुरती दुरवस्था झाली आहे. हा सेवा रस्ता समतल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाचे पाणी साचून अपघात होण्याची भीती आहे.
तर, इतके दिवस निधी नव्हता. त्यामुळे काम झाले नाही, असे कारण देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथे सुविधा पुरवण्यासाठी असमर्थ ठरत आहे. अशा स्थितीत स्थानिक नागरिक मात्र जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
नवले पुलाखाली उतार असल्यामुळे पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी येथे चेंबर किंवा आउटलेटची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाऊस आला, की या भागात पाणी साचते. पाणी जाण्यासाठी असलेली नाली सध्या भारतीय राज्यमार्ग परिवहन प्राधिकरण (एनएचएआय) यांनी खोदून ठेवली आहे.
अंधारावेळी या भागात अपघात होण्याची भीती आहे. अनेक दिवसापासून हे काम रेंगाळलेले आहे. त्यामुळे ते काम ताबडतोब पूर्ण करून वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत करावी, अशी दाद या भागातील नागरिक मागत आहेत.
प्रशासनाचे दावे…
“महामार्ग प्रशासनाचे कार्यकारी अभियंता एस. एस. कदम यांच्याशी याबाबत बोलणे झाले. मध्यंतरी निधीची अडचण होती. त्यामुळे टप्प्याटप्प्याने काम सुरू आहे. सध्या कात्रजचा नवीन बोगदा ते नवले पुलापर्यंत बऱ्यापैकी काम पूर्ण झाले सीसीटीव्ही लागले. बॅरिकेट्स, सूचनाफलक लावले गेले. सेवा रस्त्याचे रुंदीकरण झाले. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले. राहिलेले काम लवकरच पूर्ण करण्यात येईल,’ असा दावा त्यांनी केल्याचे सारंग नवले यांनी सांगितले.
कात्रज ते नवले पुलापर्यंत महामार्ग चौपदरी झाला. त्याचे रुंदीकरण झाले. परंतु नवले पुलाच्या डाव्या बाजूला साताराकडे जाणारा सेवा रस्ता अरुंदच आहे. येथे काही दिवसांपूर्वी “एनएचएआय’तर्फे बस थांबा उभारण्यात आला. परंतु, आजूबाजूला कचऱ्याचे साम्राज्य आहे. हा रस्ता तातडीने रुंद करण्याची गरज आहे. त्यामुळे कात्रजकडून येणारी वाहतूक डाव्या बाजूने मुख्य रस्त्याला मिळेल.
– सारंग नवले,
पदाधिकारी, भाजप.