पुणे, दि. 2 – “आम्हाला अपेक्षित होता असाच पूल पडलेला आहे.’ “पूल पूर्ण पाडायचा नव्हता, तर तो खिळखिळा करायचा होता. पूल पडला असता तर त्याचा मोठा हादरा बसला असता. रस्त्याचेही नुकसान झाले असते. त्यामुळे आमचा प्रयत्न यशस्वी झाला,’ असा दावा पुलाचे पाडकाम करणाऱ्या इडिफाइस कंपनीने केला आहे.
ब्लास्ट झाल्यावर उडालेली धुळ बाजूला होताच पुलाचा सांगाडा जैसे थे असल्याचे दिसून आले. त्यामुळे ब्लास्ट तर झाला मग पूल का पडला नाही? असे प्रश्न सुरू झाले आणि “नियोजन फसले’ अशी चर्चा सुरू झाली. यावेळी ब्लास्ट एक्सपर्ट आनंद शर्मा म्हणाले, “पुलाच्या बांधकामात अपेक्षेपेक्षा अधिक स्टील आहे. जाळीचे दोन थर वापरण्यात आले आहे. त्यामुळे सिमेंटचे काम फुटले. जाळी, स्टील काढताच उर्वरित पूल पडेल.’ दरम्यान, कंपनीचे इंजिनियर छेडा म्हणाले, “पूल खाली पाडणे हे नियोजन नव्हते. तर ब्लास्ट करून पुलाचे सिमेंट, लोखंड हे वेगळे करणे मुख्य उद्देश होता. तो साध्य झाला आहे. तेच पूल पाडायचा असता तर आपण अजून ईमल्शन स्फोटकांचा वापर केला असता. मात्र, तसे करणे धोक्याचे होते. स्फोटकामुळे दगड, धुलीकण उडण्याचे प्रमाण वाढले असते. पूल पडल्यामुळे मोठा आवाज आणि हादरे बसले असते.’
पशु-पक्ष्यांचा कलकलाट, मोरांचा केकारव…
चांदणी चौकात जो ब्लास्ट झाला, तो नियंत्रित असला तरी उच्च क्षमतेचा होता. मध्यरात्री निवांत असलेले परिसरातील भटके प्राणी, लगतच्या टेकड्यांवरील झाडीत निवाऱ्यास असलेले पक्षी, प्रामुख्याने या स्फोटाच्या आवाजाने बिथरले…यानंतर त्यांचा एकच किलबिलाट झाला. मोरांचा केकारव सुरू झाला. प्रशासनाने पुलाच्या 200 मीटर परिघातील माणसांच्या सुरक्षेची तजवीज केली, पण बिचारे अबोल जीव कोणाकडे दाद मागणार आणि कोणाला विचारणार?, की नेमकं काय झालंय अन् आवाज कशाचा झालाय..?