आंबेगाव बुद्रक, दि. 4 (प्रतिनिधी) –आंबेगावसह दत्तनगर, नऱ्हे परिसराचे नागरिकरण वेगाने झाले आहे. त्यामुळे दत्तनगर ते नऱ्हे रस्त्यावर वर्दळ वाढली असून जवळचा मार्ग म्हणून परिसरातील नागरिक या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. परंतु, हा मार्ग अपुरा पडत असून आंबेगाव दत्तनगर, नऱ्हे या भागातून राष्ट्रीय मार्गावरील भुमकर चौक भुयारी मार्गातील चौकांमध्ये वाहतूक कोंडीही होत आहे. याबाबत वाहतूक शाखेकडे अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. परंतु, वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे.
कात्रज ते खडकवासला पर्यंतच्या भागात जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून तसेच महामार्गावर येण्या-जाण्यासाठी वाहन चालक दत्तनगर-नऱ्हे रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. यामुळे या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. या भागात स्वामीनारायण मंदिर महामार्गालगतच आहे, त्यामुळे या रस्त्यावरून भाविकांचीही मोठी वर्दळ असते. सायंकाळी 06:00 ते 08:00 या वेळेत भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या सेवा रस्त्यावर कोंडी होत आहे.
सदर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावर दुभाजक उभारून गतिरोधक दिवे बसवावेत, अशी जुनी मागणी आहे. परंतु, याकडेही दुर्लक्ष केले जात असून चौकातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक विभागासह पालिका प्रशासनानेही योग्य ते उपाय करून चौकाचा नियोजनबद्ध विकास करावा, अशी मागणी होत आहे.