लॉकडाऊनमधील पातळी अनलॉकमध्ये किंचीत वाढली
पुणे – लॉकडाऊन काळात अगदी एक अंकी पातळी गाठलेले हवेचे प्रदूषण आता हळूहळू वाढत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या काळात “उत्तम’ असलेली पुण्याची हवा आता “समाधानकारक’ पातळीवर पोहचली आहे. शहरातील हवेच्या प्रदूषणात किंचित वाढ झाली असल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदविले आहे.
लॉकडाऊनकाळात वाहतूक आणि उद्योगांवर असलेल्या बंदीमुळे शहरातील वाहतूक अचानकपणे खालावली होती. त्याचबरोबर हवेच्या प्रदूषणातही कमालीचा घट अनुभवायला मिळाला. 100 ते 130 मेट्रिक घनमीटर दरम्यान असलेले प्रदूषित घटकांचे प्रमाण अगदी सहा ते आठ मेट्रिक घनमीटर इतक्या प्रमाणात खालावले होते. पर्यावरणासाठी ही अत्यंत चांगली बाब मानली जात असून या काळात हवेची गुणवत्ता “उत्तम’ असल्याची नोंद राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सफर या संस्थांनी नोंदविली होती.
मात्र, अनलॉक काळामध्ये उद्योग आणि वाहतुकीवरील बंदीचे नियम शिथिल करत, सरकारडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शहरातील वाहतुकीमध्ये हळूहळू वाढ होत आहे. साहजिकपणे त्याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवरही होत आहे. शहरात गेल्या काही दिवसापासून हवेतील प्रदूषित घटकांच्या प्रमाणात किंचित वाढ होत आहे. ही वाढ प्रमाण मर्यादेपेक्षा कमी असली तरी भविष्यात हे प्रमाण धोकादायक पातळी गाठण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, शहरातील हवेच्या गुणवत्तेची नोंदी घेण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे विविध ठिकाणी सहा मोजणी यंत्रे बसविली आहेत. मात्र, यापैकी नळस्टॉप येथील यंत्र वगळता इतर सर्व यंत्रे ही “मॅन्युअल’ प्रकारातील असल्याने, या भागांमधील “रिअल टाइम’ नोंदी प्रदूषण मंडळाकडे उपलब्ध नाही. याठिकाणी देखील ऑटोमॅटिक यंत्रे बसविण्याची मागणी मंडळाकडून करण्यात आली असून, अद्याप निर्णय झाला नसल्याचे मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.