खडकवासला, पानशेत भरले; वरसगाव भरण्याच्या मार्गावर
पुणे – खडकवासला धरणापाठोपाठ पानशेत धरणसुध्दा 100 टक्के भरले आहे. पानशेत धरणातून 2 हजार 407 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. आता वरसगाव धरणसुध्दा भरण्याच्या मार्गावर असून धरणात 87.43 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून एकूण पाणीसाठा 26.35 टीएमसी म्हणजे 90.41 टक्के उपलब्ध झाला आहे. खडकवासला प्रकल्पात चांगला पाणीसाठा जमा होत असल्याने पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर मात्र सुमारे दोन महिने पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत धरणात अल्प पाणीसाठा शिल्लक राहिला होता. यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार उभी राहिली होती. आधीच करोनाचे संकट त्यानंतर पावसाची विश्रांती त्यामुळे पाणीटंचाईची समस्या उभी राहिली होती.प्रशासनाकडून गणेशोत्सवानंतर पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, मागील दहा दिवसांपासून पावसाने पुन्हा चांगली हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली. त्यामुळे आता पाणीकपातीची शक्यता निवळली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
टेमघर, वरसगाव, पानशेत या तिन्ही धरणातून सोडण्यात येणारे पाणी हे खडकवासला धरणात जमा होते. पानशेत धरण भरले असून त्यामधून पाणी सोडण्यात येत आहे. आता वरसगाव धरणसुद्धा भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे साठा नियंत्रित करण्यासाठी खडकवासला धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. खडकवासला धरणातून नदीमध्ये 9 हजार 361 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरण परिसरात मंगळवारी दिवसभरात 3 मिमी, पानशेतमध्ये 7 मिमी, वरसगावमध्ये 7 मिमी आणि टेमघर धरणात 15 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
खडकवासला धरणात 1.87 टीएमसी, पानशेतमध्ये 10.65 टीएमसी, वरसगावमध्ये 11.21 टीएमसी आणि टेमघरमध्ये 2.63 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. उपलब्ध पाणीसाठ्यावर पाणी वाटपाचे नियोजन ठरते. त्यामुळे खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यावर नागरिकांचे लक्ष असते. शहराची तहान आणि हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतीसाठी हे पाणी उपयुक्त ठरते.