दररोजच्या वाढत्या गर्दीमुळे संसर्ग पसरण्याची पुन्हा भीती
पुणे – करोनाच्या नव्या बाधितांचा दर पाच टक्क्यांखाली आल्याने पुणे शहरातील लॉकडाऊन थोडेसे शिथिल करण्यात आले. त्यानंतर “करोना संपला’ अशा गैरसमजात असलेले नागरिक ठिकठिकाणी गर्दी करत आहेत. मात्र “करोनाची दुसरी लाट संपलेली नसून, ती ओसरत आहे,’ याची जाणीव या गर्दीला निश्चितच नाही.
गर्दी आणि करोना प्रतिबंधक नियमांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग पुन्हा वाढू शकतो आणि पर्यायाने शहर पुन्हा “लॉक’ होऊ शकते. शिवाय, तिसरी लाट लवकर येण्याची भीती आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागील अडीच महिन्यांपासून कठोर लॉकडाऊन लागू होते. आता बहुतांश जिल्ह्यांत चाचण्यांच्या तुलनेत नव्या बाधितांचा दर तीन टक्क्यांखाली आला आहे. त्यामुळे तेथील निर्बंध काहीसे हटवण्यात आले. मात्र, पुणे, सातारा, कोल्हापूरसह कोकण विभागातील तीन जिल्हे आजही “रेड झोन’मध्ये आहेत. पुणे शहर भागातील बाधित दर पाच टक्क्यांच्या थोडासा खाली आहे. मात्र, ग्रामीण भागातील बाधित दर 7 ते 8 टक्के इतका आहे. त्यामुळे पुणे जिल्हा अजूनही “रेड झोन’मध्ये आहे.
सध्या करोनाची दुसरी लाट ओसरताना ती पुन्हा वाढणार नाही, याची खबरदारी नागरिकांनी घ्यायची आहे.आता विशेषत: तुळशीबाग, मार्केटयार्ड, मंडई या मध्यवर्ती भागांसह उपनगरांतील बाजारपेठांमध्ये सकाळपासून गर्दी दिसते.त्यामध्ये काही व्यावसायिक करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करताना दिसतात. मात्र, काही व्यावसायिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हॉटेल आणि शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. ती टाळून तिसरी लाट थोपवणे शक्य आहे.
व्यावसायिकांनो, “हे’ नियम पाळाच
लॉकडाऊनची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, असे वाटत असेल तर व्यावसायिकांनी ग्राहकांसाठी नियमावली करावी. एकावेळी दोन ते तीन व्यक्तींनाच दुकानात प्रवेश द्यावा. गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी घ्यावी. दुकानात येणाऱ्या व्यक्तीचे तापमान आणि ऑक्सिजन चेक करावे. आजारी व्यक्तींना प्रवेश देऊ नये. सॅनिटायझर वेळोवेळी वापरावे. व्यवहार शक्यतो ऑनलाइनच करावेत. कामगार आणि ग्राहकांना मास्क बंधनकारक करावे. मोठ्या दुकानांमध्ये अपॉइंटमेंट देऊन व्यवहार सुरू ठेवता येतील.
नागरिकांनो, “हे’ तुमच्यासाठी
आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, ही खूणगाठ बाळगली तर रस्त्यावरील गर्दी निम्म्याने कमी होईल. अनेक नागरिक विनाकारण फिरताना दिसतात. जे काम एक व्यक्ती करू शकते, त्यासाठी दोन ते तीन व्यक्ती घराबाहेर पडत आहे. दुकान, मंडई, मॉल, हॉटेलमध्ये गर्दी असेल तर जाणे टाळावे. वस्तू घरात नेण्यापूर्वी सॅनिटाइझ करावी. मास्क योग्य पद्धतीने आणि चांगलाच वापरावा. लक्षणे दिसताच तत्काळ चाचणी करून उपचार घ्या. सुरक्षित अंतर ठेवा, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
लॉकडाऊन शिथिल होताच तरुण-तरुणी किंवा कुटुंब फिरण्यासाठी निघतात. प्रामुख्याने हे टाळावे. सामाजिक व आर्थिक व्यवहार वाढवण्यासाठी नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखावी. कौटुंबिक उत्सव, लग्नसमारंभ मर्यादित स्वरूपात ठेवावे. आपली एक चूक संसर्गाला निमंत्रण देऊ शकते.
– डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र