पुणे – जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक (नववी ते बारावी) शाळा सुरू झाल्या असल्याची सोमवार केवळ 4 टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. करोना संसर्गाच्या भीतीने अनेक पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत तयार नसल्याचे यावरून दिसून येत आहे. मात्र, शाळेत आलेल्या विद्यार्थ्याला संसर्ग होणार नाही याची खबरदारी जिल्हा परिषद घेत आहे. त्यातही एखाद्याला झाल्यास त्याच्या उपचाराची जबाबदारी जिल्हा परिषद घेणार आहे.
अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी शिक्षण समितीचे सभापती व उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनिल कुऱ्हाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी गणपत मोरे उपस्थित होते.
रणजीत शिवतरे म्हणाले, शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांच्या खोल्या व परिसर निर्जंतुकीकरण करून घेतले आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक नियमानुसार शाळा सुरू झाल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याची थर्मलगन, पल्स ऑक्सिमीटरने तपासणी करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत बसवण्यात येत आहे. शाळेमध्ये विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात राहू नये यासाठी मधली सुट्टी किंवा खेळाचे तास घेण्यात येणार नाही.
माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणतात…
स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या करोना चाचण्या घेतल्या जात आहेत. आतापर्यंत 6 हजार 565 शिक्षकांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यातील 29 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक इंदापूर तालुक्यात 8, तर पुरंदरमध्ये 6 शिक्षकांचा समावेश आहे. पुढील सात दिवसांत सर्व शिक्षकांच्या तपासण्या पूर्ण करून टप्प्याटप्याने सर्व शाळा सुरू केल्या जातील, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी सांगितले.
साडेदहा हजार पालकांकडून संमती पत्र
शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांकडून संमती पत्र मागवले होते. जवळपास 10 हजार 50 पालकांनी ते शिक्षण विभागाला पाठवले. यात काही पालक हे शाळा सुरू करण्यास अनुकूल होते. तर काहींच्या मते लस येईपयर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी करत पाल्यांना शाळेत पाठवणार नसल्याचे म्हटले आहे.
पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. 1 डिसेंबरपर्यंत ही संख्या वाढले. सर्व शाळा टप्याटप्याने सुरू होतील.
– निर्मला पानसरे, अध्यक्षा, जि.प.पुणे