पुणे – जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागाकडील कामे मार्च अखेर पूर्ण करण्यासाठी तसेच अस्थापना आणि प्रशासकीय कामे पूर्ण करण्याची गडगबड सर्वच कार्यालयात सुरू आहेत. ही कामे 31 मार्चच्या आत पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार सर्व विभाग, पंचायत समितीकडील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित रहावे, असा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.
प्रशासक नियुक्तीनंतर मार्च अखेर आल्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची प्रस्ताव तयार करणे, त्याला मान्यता देत निविदा प्रक्रिया राबविणे. पेन्डींग बिल काढणे यासह विविध कामांची गडबड सुरू झाली. त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठेकेदारांसह विविध व्यक्तींची बिल काढून घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. मार्च एंडिगला केवळ 7 दिवस राहिले असून, त्यामध्ये दोन दिवस सुटीचे आहेत. त्यामुळे विविध विभागाकडील मार्च अखेरची कामे पूर्ण करणे तसेच विभागाकडील आस्थापनाविषयक व प्रशासकीय कामकाजाचा निपटारा करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात नियमित वेळेमध्ये उपस्थित राहून कामकाज करावयाचे आहे. जे अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित राहतील त्यांचेवर शिस्तभंग कारवाई विभागप्रमुख यांनी करावयाची असल्याचे सीईओ आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे.