पुणे -प्रशासक असले तरी नागरी विकासकामांसाठी जिल्हा परिषद खुली आहे. गावातील, तालुक्यातील कोणतेही काम असल्यास नागरिक जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये जावून त्याची माहिती घेऊ शकता. दरम्यान, आता तालुक्यासाठी महिन्यातून एकदा सरपंच परिषद बोलाविण्यात येणार आहे.
प्रशासक म्हणून कामकाज करताना नागरिकांच्या तक्रारी तसेच विकासकामांसाठी लोकांचा सहभाग घेऊन कामकाज होईल, असे सीईओ तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले. तालुका पंचायत समिती स्तरावर महिन्यातून एकदा सरपंचांची बैठक घेऊन त्यांचा प्रशासकीय कामकाजामध्ये सहभाग घेतला जाईल. तसेच गट विकास अधिकारी यांना महिन्यातून एकदा एका जिल्हा परिषद गटात जाऊन जनता दरबार घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रत्येक महिन्यामध्ये जनता दरबार घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर, जिल्हा परिषदेतील सोमवार आणि शुक्रवार जनतेसाठी खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून दुसरा अनुभव आहे. कामकाजामध्ये लोकसहभाग, त्याचबरोबर आमदार यांच्या सूचना आणि शिफारशी विचारात घेतल्या जातील. यासंदर्भात पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून कामकाज केले जाणार आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.