सभा यशस्वी ठरल्याचा मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा
आगामी काळात राजकारणाला कलाटणी मिळणार का?
पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्वाचा मुद्दा जवळ केल्याने पक्षाला राज्यासह इतर राज्यांतील संघटना, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याचे ठाणे येथील सभेतून समोर आले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेला अगदी उत्तर प्रदेश, बिहारसह जम्मू काश्मीरमधील युवकांनी उपस्थिती लावल्याचा दावा शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
मराठी माणसाच्या न्याय हक्क तसेच परप्रांतीयांविरोधात आंदोलन करीत राजकारणाची सुरुवात केलेल्या मनसेने आता हिंदुत्त्वाचा मुद्दा जवळ केला आहे. ठाणे येथील राज ठाकरे यांच्या सभेतून हे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही ठाकरे यांनी गुढीपाडव्याला घेतलेल्या सभेत हिंदुत्वाच्या विषयावरच भर दिला होता.
“भोंगे उतरवा’ त्यांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रसह उत्तरप्रदेश, बिहार यासह अन्य राज्यातील हिंदुत्ववादी संघटनांसह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष ठाकरे यांच्याकडे पुन्हा वेधले गेले. याच कारणातून राज यांच्या सभेपूर्वी ठाण्यात “मुंबई मे बैठा हिंदूओ का राजा, अपनी हिफाजत चाहिए तो मनसे में आजा’, अशा आशयाचे फलक झळकले होते, सभेनंतरही हे फलक आजही सर्वांचे लक्ष वेधत आहेत.
विशेष म्हणजे ठाकरे यांच्या सभेला राज्याबाहेरील परप्रांतीयांचीही मोठी गर्दी झाल्याचे मनसेचे पदाधिकारी सांगत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांची ठाण्यातील सभा आगामी काळात राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.