पुणे – माण-हिंजवडी ते शिवाजीनगरच्या मेट्रो मार्गिका-3 च्या कामाला गुरुवारी प्रत्यक्षात सुरुवात झाली. सार्वजनिक-खासगी सहभाग असलेला (पीपीपी) हा देशातला पहिलाच मेट्रो प्रकल्प असून, येत्या तीन वर्षांत या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होणार आहे.
पीएमआरडीएच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या “माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’च्या मार्गाचे काम सुरू करण्यासाठी तांत्रिक अडचणी आणि मान्यतेचा प्रश्न उभा राहिला होता. तो सोडविण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात प्रत्येक आठवड्याला याबाबतची विशेष आढावा बैठक घेण्यात येत आहे. यात या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यात आला. त्यामुळे या मेट्रोच्या मार्गिकेसाठी आवश्यक असणाऱ्या जागांचे संपादन “भू-संपादन व पुनर्वसन कायदा’चा अवलंब करण्यात आला आहे. मेट्रो कार डेपो, राईट ऑफ वे आणि स्टेशनसाठी लागणारी सुमारे 98 टक्के जमीन प्राधिकरणाने संपादित केली आहे.
प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व परवानग्या व लायसन्स प्राप्त करून घेण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याआधीच इतके भू-संपादन व विहीत सर्व परवानग्या प्राप्त करणारा हा देशातला पहिला प्रकल्प आहे.
या प्रकल्पासाठी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन अभिकरण मे. ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स पुढे आल्या आहेत. त्यांनी “पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि. ही विशेष उद्देश संस्था स्थापन केली आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी ट्राफिक डायव्हर्जन प्लॅन तयार करण्यात आला आहे.
23.2 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर 23 स्टेशन्स
या मेट्रो मार्गिकेची लांबी 23.2 किलोमीटर असून या मार्गामध्ये 23 स्टेशन्स प्रस्तावित आहेत. केंद्र सरकारच्या “मेट्रो रेल धोरण 2017′ अन्वये सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येत असलेला हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्याबरोबरच राज्य सरकारचे 20 टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य लाभणार आहे. पुणे शहरातील पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचे दीर्घकालीन निराकरण करण्यासाठी प्रस्तावित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे डिझाईन तयार करण्यात आले असून, त्याला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (पुम्टा) व पुणे महानगरपालिका यांची मान्यता घेण्यात आली आहे.