पुणे – जिल्हा परिषदेचे लोकसहभागाचे अनेक कार्यक्रम लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आले. त्यामध्ये बचत गटांसाठी प्रदर्शन आणि विक्री तसेच जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या स्वच्छतेच्या बक्षीस वितरण सोहळा हे दोन्ही कार्यक्रम रद्द झाले. त्यामुळे आचारसंहिता संपल्यावर हे कार्यक्रम होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गतवर्षी जिल्ह्यातील सर्व महिला बचत गटांसाठी जिल्हा परिषदेने कार्यक्रम घेतला होता. यावर्षी कार्यक्रमाची रुपरेषा ठरली असताना, मुख्यमंत्र्यांनी महिला मेळावा आणि बचत गटांचा कार्यक्रम एकत्रित घेण्याच्या सूचना केल्या. मात्र, कमी कालावधीत नियोजन झाले नाही आणि पुढे आचारसंहिता लागू झाल्याने कार्यक्रम रद्द करावा लागला. जिल्हास्तरीय महिला बचत गटांचे प्रदर्षण आणि विक्री या कार्यक्रमात मोठी उलाढाल गतवर्षी झाली होती. त्यामुळे यावर्षीही हा कार्यक्रम घेण्याची मागणी बचत गटांकडून गेली जात आहे. तर जिल्ह्यात स्वच्छ गाव स्वच्छ तालुका स्पर्धा राबवण्यात आली. यामध्ये विजेत्या गाव आणि तालुक्यांना बक्षीस वितरण कार्यक्रम देखील होणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकाने मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभाग घेतला परंतु बक्षीसेच मिळाली नाही. त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम आचारसंहिता संपल्यानंतर घ्यावीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.