32 प्रभागांत बदल झाल्याने मतांमध्ये फाटाफूट
पुणे – यापूर्वीच्या 32 प्रभागांच्या सीमारेषांत अंतिम प्रभाग रचनेत बदल करण्यात आला आहे. त्याचा परिणाम या निवडणुकांत अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षित उमेदवारांच्या मतांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रभाग रचना बदलल्याने लोकसंख्येतही बदल झाला असून अनुसूचित जातींचे आरक्षण पडू शकणाऱ्या 3 प्रभागांतील लोकसंख्या कमी होऊन शेजारच्या प्रभागात जोडली गेली आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे.
आगामी निवडणुकीद्वारे महापालिका सभागृहात 173 सदस्य निवडले जाणार आहेत. यात आरक्षणानुसार अनुसूचित जाती उमेदवारांसाठी 23, तर अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी 2 जागा आरक्षित असतील. नवे रचनेद्वारे प्रभाग 14 मध्ये 520 लोकसंख्या कमी करण्यात आली आहे, या प्रभागात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची शहरातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असून ती बदलांमुळे जवळपास 70 ने कमी होत आहे. तर सर्वाधिक फटका प्रभाग 26 मध्ये बसणार आहे.
येथे अनुसूचित जातीची लोकसंख्या 15 हजार 882 वरून थेट 10 हजार 993 वर आली आहे. अशीच स्थिती प्रभाग 46 आणि 50 मध्ये असून या दोन्ही प्रभागात अनुसूचित जातींची लोकसंख्या कमी झाली आहे. दरम्यान, या लोकसंख्या कमी झाल्या असल्या तरी या प्रभागांच्या संभाव्य आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, या उमेदवारांचा हक्काचा मतदार इतर प्रभागात जोडला गेल्याने उमेदवारांना अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
* पदाधिकारी म्हणतात…
या प्रभाग रचनेचे आम्ही स्वागत करतो. ही रचना कशीही झाली असती महापालिकेत सत्ताबदल अटळ असून राष्ट्रवादीच सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील असे चित्र आहे. ही प्रभाग रचना निवडणूक आयोगाने केलेली असून, त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप करण्यात आलेला नाही. उलट कच्च्या प्रारूप प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप झाला होता. अखेर ही प्रभाग रचना योग्य पद्धतीने झाली आहे.
– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाला आहे. काही ठरविक विधानसभा मतदारसंघात झालेले बदल पाहता, हे शहराच्या विकासासाठी घातक आहे. निवडणुका पारदर्शकपणे होणे हे आयोग आणि महापालिकेचे कर्तव्य आहे. मात्र, ठराविक राजकीय पक्षांना हाताशी घेऊन अशा प्रकारे चुकीचे कामकाज करणे योग्य नाही. मात्र, प्रभाग कसेही झाले, तरी मनसेला फरक पडणार नाही. मनसेचे कार्यकर्ते प्रभाग रचना बघून नाही, तर नागरिकांसाठी काम करतात. त्यामुळे आम्हाला फरक पडत् नाही.
– साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, मनसे
शिवसेनेसाठी आणि महाविकास आघाडीसाठी ही प्रभाग रचना अनुकूल आहे. ही रचना निवडणूक आयोगाकडून अंतिम करण्यात आली आहे. त्यात कोणताही हस्तक्षेप झालेला असेल असे वाटतं नाही. प्रारूप प्रभाग रचनेनंतर नागरिकांकडून हरकती आणि सूचना नोंदविल्या होत्या. त्याच्या सुनावणीनंतरच हा अंतिम आराखडा तयार झालेला आहे. त्यामुळे शिवसेनेला प्रभाग रचनेचा काहीही फरक पडणार नाही. आम्ही सत्तेत येऊच याचा विश्वास आहे.
– गजानन थरकुडे, शहरप्रमुख, शिवसेना
काल जी प्रभाग रचना झाली, त्यात 32 बदल केले. प्रारूप प्रभाग रचनेतही राष्ट्रवादीने हस्तक्षेप केला. पूर्णपणे राजकीय दबावातून ही प्रभाग रचना झाली आहे. मात्र, कशीही झाली तर महापालिकेत भाजपचची सत्ता येणार हे निश्चित आहे. गेल्या 25 वर्षांत जो विकास झालेला नाही, तो भाजपने पाच वर्षांत करून दाखविला आहे. त्यामुळे आमची सत्ता येणार हे निश्चित आहे. अशा प्रकारे प्रभाग बदलून कोणीही भाजपला थांबवू शकत नाही.
– जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप
अंतिम प्रभाग रचनेत 32 ठिकाणी बदल केलेले आहेत. आम्ही राज्यात महाविकास आघाडीत असलो, तरी आम्ही स्वबळाच्या तयारी केलेली असून 173 उमेदवारांची तयारी ठेवली आहे. आमचे उमेदवार सर्वसामान्य असणार आहेत. प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप झाला आहे वाटत नाही. महापालिकेवर प्रशासक नियुक्ती केली असल्याने कोणताही पक्ष त्यात हस्तक्षेप करू शकणार नाही, असे वातावरण आहे.
– रमेश बागवे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस
पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचे समोर येत आहे. याबाबत आमच्याकडे तक्रारीदेखील येत आहेत. शहरातील अनेक प्रभाग भौगोलिकदृष्ट्या चुकीचे मांडण्यात आले आहेत. याबाबत यापूर्वी सर्वसामान्य नागरिकांनी आक्षेप घेतले होते. मात्र, त्यांच्या हरकती आणि सूचनांना कोणतेही स्थान देण्यात आलेले नसल्याचे या प्रभाग रचनेत दिसते आहे. सध्या ज्या-ज्या प्रभागांत राजकीय पदाधिकारी नेत्यांना अडचणी झाल्या, त्या सोडवित त्यांच्यासाठी अनुकूल प्रभाग रचना करण्यात आल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून स्पष्ट दिसून येते. त्यामुळे ही प्रभाग रचना पारदर्शक नाही, तर हस्तक्षेपयुक्त आहे.
– डॉ. अभिजित मोरे, राज्य प्रवक्ते, आम आदमी पक्ष