पुणे : कांद्याची भाववाढ झाल्यानंतर सरकारला सत्तेतून खाली खेचणारे भारतीय, स्वच्छ पाणी, शुद्ध हवा या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर का धरत नाहीत, असा सवाल लडाख येथील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केला. सुरा भोसकणारा मोठा गुन्हेगार असतो, त्याप्रमाणे आपल्या भोगवादी, चंगळवादी जीवनशैलीमुळे स्वतःसह इतरांचेही आयुष्य अनैसर्गिकपणे संपवणाराही गुन्हेगार नाही का, असाही प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.
फ्रेंड्स ऑफ लडाख, फ्रेंड्स ऑफ नेचर पुणेतर्फे रविवारी दुपारी गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या सेमिनार हॉलमध्ये वांगचुक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे गुरुदास नूलकर, प्रा. प्रीती मस्तकर, आयोजक संस्थेचे संतोष ललवाणी, रुपेश सरोदे, प्रीती पुष्पा-प्रकाश आदी उपस्थित होते.
शहरातील नागरिक साधेपणाने जगल्यास डोंगराळ भागातील नागरिकांना साधे जीवन जगता येईल, असे सांगून लडाखच्या आंदोलनाला पुण्यासह देशभरातून मिळालेल्या सहकार्याबद्दल वांगचूक यांनी आभार मानले. लडाखमधील प्रस्तावित वीजनिर्मिती प्रकल्पामुळे तेथील अनेक नागरिकांचा उदरनिर्वाह संपुष्टात येण्याची शक्यता असून, दिल्लीतील चंगळवादासाठी वीजपुरवठा केला जाणार असेल, तर आम्हाला नक्कीच वाईट वाटेल. लडाखच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यात पर्यावरणाच्या रक्षणासाठी विविध गट लढाई लढत असून, त्यांच्या एकजुटीची गरज आहे. त्यासोबतच धर्म, न्यायव्यवस्था अद्ययावत करणे ही काळाची गरज आहे, असे वांगचूक यांनी नमूद केले.
पुण्यातील मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाला त्यांनी विरोध दर्शवित नदी पुनरुज्जीवन चळवळीला पाठिंबा दर्शविला. आयोजक संतोष ललवाणी यांनी प्रास्ताविक केले. डी. जे. फाउंडेशनचे दिलीप जैन यांनी मनोगत व्यक्त केले.