ज्येष्ठ नेते शरद पवार : ब्राह्मण समाजाला आरक्षणाचे सूत्र लागू होणार नाही
पुणे –ब्राह्मण समाजाबद्दल जी काही वक्तव्ये केली होती, त्यामुळे असंतोष निर्माण झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जबाबदार नेत्यांनी कोणत्याही जातीधर्माबद्दल वक्तव्ये करू नयेत, अशा सूचना दिल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, समाजाने भगवान परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली असून, त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्यात येणार आहे, असे आश्वासन त्यांना दिले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण समाजाबाबत राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार यांच्याकडून टीका करण्यात आली. यासंदर्भात ब्राह्मण संघटनांशी चर्चा करण्यासाठी पवार यांनी पुण्यात बैठक बोलविली होती. बैठकीला 14 ब्राह्मण संघटनांचे सुमारे 40 प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर पवार यांची पत्रकार परिषद झाली. “ब्राह्मण समाज ग्रामीण भागातून शहरी भागात येत आहेत. सेवा क्षेत्रात त्यांना संधी आहे. त्यांना आरक्षण हवे आहे. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकरीत ब्राह्मण समाज जास्त आहे. त्यामुळे या समाजासाठी आरक्षणाचे सूत्र लागू होणार नाही, असे पवार म्हणाले.
राज्यातील वातावरण खराब झाले असे वाटत नाही. पण जबाबदार लोकांनी जाती, धर्माबद्दल बोलताना काळजी घेतली पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले. पेट्रोल, डिझेल आयात केल्यानंतर पहिला टॅक्स केंद्र लावते. त्यानंतर राज्य सरकार टॅक्स लावते. केंद्र व राज्य यांच्या टॅक्स मध्ये किती फरक आहे हे पाहावे लागणार आहे. केंद्राने दर कमी करून एक पाऊल टाकले, काही न करण्यापेक्षा काही तरी केले,’ असे मतही पवार यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादीची शिल्लक मते शिवसेनेला
राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज्यसभेची एकच जागा आहे. दोन वर्षांपूर्वी दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. ती मागणी त्यांनी मान्य केल्याने आता दुसरी जागा दिली आहे. शिवसेना जो कोणी उमेदवार देईल त्याला राष्ट्रवादीच्या कोट्यातील शिल्लक मते देण्यात येतील, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.