पुढील महिन्यात पुन्हा बैठक घेणार
पुणे – खडकवासला प्रकल्पाच्या कालवा समितीच्या बैठकीत जलसंपदा विभाग व महापालिका पुन्हा आमनेसामने उभे राहिल्याचे दिसून आले. अशातच शहरी भागातून शहरी भागाला पाण्याचा कोटा वाढवून मिळावा, अशी मागणी तर तर ग्रामीण भागातूनही शेतीला जादा पाणी मिळावे, अशी मागणी ग्रामीण मधील लोकप्रतिनिधींनी केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पाणी वाटपाचा अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे पाणीवापर “जैसे थे’ राहणार आहे. दरम्यान, पाणी वाटपासाठी पुढील महिन्यात पुन्हा बैठक घेणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
नवीन शासकीय विश्रामगृह येथे कालवा समितीची बैठक झाली. यापूर्वी पाणी वाटपाची दोनदा बैठक झाली. मात्र, या बैठकीत अंतिम निर्णय न झाल्याने शुक्रवारी ही बैठक पुन्हा घेण्यात आली. यात निर्णय झाला नाही. त्यामुळे बैठका होतात, मात्र निर्णय नाही, असे चित्र दिसून येते.
खडकवासलातून पाणी वापर कमी करा
भामा-आसखेड प्रकल्पातून पुणे शहरासाठी पाणी वापर सुरू केल्यानंतर महापालिकेने खडकवासला प्रकल्पातून करत असलेला पाणीवापर त्या प्रमाणात कमी करणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेकडून खडकवासला प्रकल्पातील पाणीवापर कमी केलेला नाही. त्यामुळे उन्हाळा हंगामातील दुसऱ्या आर्वतनासाठी खडकवासला प्रकल्पातील पाणी कमी उपलब्ध होणार असल्याची वस्तुस्थिती जलसंपदा विभागाकडून मांडण्यात आली.