पुणे – जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषण परिस्थिती असून पाण्याचा अपव्यव होऊ नये यासाठी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना टाक्या पुरविण्याबाबत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 12 कंपन्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सीएसआरच्या माध्यमातून गावांना पाण्याच्या टाक्या पुरविल्या आहेत. त्यामुळे पाण्याची नासाडी कमी झाली आणि काटकसरीने पाणी वापरता आले.
जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, आंबेगाव, शिरूर, जुन्नर आणि खेड तालुक्यात टाक्यांचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत 471 पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून देण्यात आली.
अधिकाधिक मदत मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी कंपन्यांशी संपर्कात असून दुष्काळावर मात करण्यासाठी कंपन्यांकडे असलेल्या सीएसआरची मदत घेतली जात आहे. यामध्ये सर्वाधिक जुन्नर तालुक्यात 258 तर शिरूरमध्ये 142 पाण्यांचे टाक्यांचे वाटप कंपन्यांनी केले आहे. दरम्यान, अजूनही टंचाईची तीव्रता कायम आहे. त्यामुळे दौंड शुगरच्या वतीने मंगळवारी दुष्काळग्रस्त भागातील ग्रामपंचायतींना टाक्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, पंचायत समिती सभापती ताराबाई देवकाते, आप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, सुशांत दरेकर, नितीन दोरगे यासह ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते.