- कालवा समितीची बैठक पुन्हा लांबणीवर
- ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे निर्णय
- खडकवासला धरणातून शेतीसाठी पाणी सोडले
पुणे – जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे कालवा समितीची बैठक लांबणीवर पडली आहे. या पार्श्वभूमीवर शहरासाठी किती पाणी द्यायचे आणि ग्रामीण भागासाठी शेतीसाठी किती पाणी द्यायचे याचे नियोजन दि.21 जानेवारी 2021 नंतर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारपासून खडकवासला धरणातून रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे.
खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मिळून सध्या 91.42 टक्के म्हणजे 26.65 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पुढील वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटली असली, तरी उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन गरजेचे आहे. साधारणपणे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या कालवा समिती बैठकीत पाणी वाटपावर चर्चा होते. दि. 15 ऑक्टोबरला धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा विचारात घेऊन पिण्यासाठी आणि शेतीसाठी नियोजन करण्यात येते.
यामध्ये पुढील वर्षीच्या दि. 15 जुलैपर्यंतच पाणी वाटपाचे नियोजन होते. यंदा करोनाचे संकट त्यानंतर पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली. तर डिसेंबरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही बैठक आणखी पुढे गेली आहे.
40 दिवसांचे आर्वतन
खडकवासला प्रकल्पातील पाणी पुणे शहराला पिण्यासाठी वापरले जाते. तसेच हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती या तीन तालुक्यांसाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी सोडण्यात येते. रविवारपासून शेतीसाठी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सध्या सुमारे 1,100 क्युसेकने पाणी कालव्यातून सोडण्यात येत आहे. हे आर्वतन सुमारे 40 दिवस सुरू राहणार असून चार टीएमसीचे हे आर्वतन असणार आहे.