पुणे –फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांमधील महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या योजनेचे काम येत्या जून अखेरपर्यंत पूर्ण करून या भागाला पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. या योजनेतून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर या परिसरातील टॅंकरची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने दोन्ही गावांमध्ये पाणी पुरवठा योजना विकसित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही गावे महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर जून 2021 पासून येथील योजनेसाठी निधी उपलब्ध झाला नाही. यामुळे या योजनेचे काम संथ सुरू आहे. पुणे महापालिकेने जानेवारीमध्ये या योजनेसाठी 3 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यानंतर ठेकेदाराची बिले अदा करण्यात आली. परंतू राज्य सरकारकडून 24 कोटी रुपये निधी आल्यानंतरच या कामांना गती मिळणार आहे.
यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. यापैकी 10 कोटी 24 लाख रुपये निधी महापालिकेला द्यावा लागणार असून, त्यानंतरच संपूर्ण योजनेचे काम पूर्ण होणार आहे. दरम्यान, यापैकी साडेचार कोटी रुपये निधी तातडीने उपलब्ध झाल्यास जून 2022 अखेर जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करणे शक्य होणार आहे. ते सुरू झाले तरी फुरसुंगी गावात सध्याच्या वितरण व्यवस्थेमार्फत बहुतांश भागात आणि उरूळी देवाची मधील 60 टक्के भागात पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.
सध्या कचरा डेपोमुळे बाधित फुरसुंगी आणि देवाची उरूळी परिसरात रोज 200 हून अधिक टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दरवर्षी यासाठी 7 ते 8 कोटी रुपये खर्च होतो. जीवन प्राधिकरणचे जलशुद्धीकरण केंद्र सुरू झाले तरी टॅंकरची संख्या जवळपास 40 ने कमी होणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी तर उपलब्ध होणारच असून, टॅंकरवरील खर्चातही मोठ्या प्रमाणावर बचत होईल.
– अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा, मनपा