पुणे, दि. 8 (प्रतिनिधी) -महापालिकेला विरोध 1995 मध्ये जी गावे करून बाहेर राहिली त्यांची आज विकासाच्या दृष्टीने दुरवस्थाच आहे. तर विमाननगर, खराडी, कल्याणी नगर, वडगाव शेरी हा भाग तेव्हा महापालिकेत राहिल्याने त्या परिसराचा आज सर्वागीण विकास झाला आहे, याचा विचारही करायला हवा. वाघोलीत आज मेट्रो येत आहे. भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी आणण्याची तयारी आहे. येथील वाहतूकीची समस्या सोडविली जात आहे. अशातच निवडणूक लांबल्याने काही कामे थांबली असली तरी त्याचा आराखडा तयार आहे. लवकरच निवडणूका होऊन लोकप्रतिनिधी निवडून जातील त्यावेळी विकासकामांची गतीही वाढणार आहे. त्यामुळे वाघोली महापालिकेतून वगळावी, असा आततायीपणे कोणी चुकीची मागणी करू नये, असे आवाहन शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केले आहे.
फुरसुंगी आणि उरुळी देवाची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वाघोलीतूनही अशी मागणी होऊ लागली आहे, याबाबत कटके यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की, पालिकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आल्याने काही मर्यादा निश्चितच आल्या आहेत. परंतु, शासकीय यंत्रणा, अमंलबजावणी, नियम-कायदे अशा काही तांत्रिक बाजूही लक्षात घेणे गरजेचे आहे. आज, वाघोलीचे नागरिकरण प्रचंड वेगाने होत आहे. यातून आवश्यक मूलभूत गरजा पालिकेतूनच पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे वाघोली गाव महापालिकेत समाविष्ट असणे गरजेचे आहे. पण, कोणी वेगळा विचार करीत असेल तर चुकीचे आहे.
वाघोलीचा वाढता विस्तार पाहता ग्रामपंचायत, नगरपरिषद अथवा दोन गावांची पालिका करून सर्वांगिण विकास साधणे शक्य नाही. शासनाकडून छोट्या नगरपालिका/परिषदांना मिळणारा निधी पाहता वाघोली गाव महापालिकेतच असणे गरजेचे वाटते, असे सांगून कटके म्हणाले की, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख म्हणून जिल्ह्यात फिरत असताना अशा अनेक नगरपरिषदा अशा आहेत की त्यांची अवस्था आजही बकाल आहे.