पुणे- “महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत पुणेकरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर विश्वास दाखवत तब्बल 29 नगरसेवक निवडून दिले. त्यानंतर मनसे नगरसेवकांनी विकासासाठी सर्वाधिक कामे केली. तर, 2017 मध्ये पुणेकरांनी मनसेला नाकारल्याचे वाईट वाटते. मात्र, सध्या महापालिकेचा कारभार पाहता, पुणेकर पुन्हा एकदा मनसेला संधी देतील, असा विश्वास मनसे नेते राजेंद्र (बाबू) वागसकर यांनी व्यक्त केला.
वागसकर यांनी सोमवारी “प्रभात’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी वागसकर म्हणाले, “आगामी निवडणुकांसाठी मनसेची सर्वस्तरावर तयारी सुरू आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या सहा महिन्यांत 9 वेळा कार्यकर्ते, स्थनिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत संघटनेला बळकटी दिली आहे. निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा प्रभाग आहे. 2007 मध्ये मनसेचे 8 नगरसेवक होते.
2012 मध्ये ते 29 झाले. तर 2017 मध्ये दोन नगरसेवक निवडून आले.
ही स्थिती त्या त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमुळे होती. मात्र, यावेळी मनसे पूर्ण ताकदीने स्वबळावर निवडणूक लढवत आहे. पुण्यात पक्ष म्हणून आमची ताकद चांगली आहे. हे महापालिका निवडणुकांनंतर दिसून येईल. त्यासाठी मतदान केंद्रांच्या यादीनिहाय कार्यकर्ते नियुक्त करण्यापर्यंत पक्षाने तयारी केली आहे. त्यामुळे या तयारीचे यश निवडणुकीत नक्कीच दिसून येईल. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मनसेला पुण्याला बरेच काही द्यायचे असून, पुणेकर त्यासाठी आम्हला नक्की साथ देतील,’ असा विश्वासही वागसकर यांनी व्यक्त केला.
मनसेचे किमान 35 नगरसेवक निवडून येतील
शहरातील पक्षाची ताकद पाहता आम्ही पुण्यात स्बवळावर लढायची तयारी पूर्ण केली आहे. 2012 मध्ये ज्या विधानसभा मतदारांघात सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, तेथे पक्षसंघटन आणखी मजबूत करू. या निवडणुकीत पुण्यात मनसेचे किमान 35 नगरसेवक निवडून येतील. “शहरात उमेदवारांचा एक ठराविक आकडा निश्चित करून त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत,’ असेही वागसकर यांनी स्पष्ट केले.