पुणे (डॉ. राजू गुरव)-महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) “अस्वच्छते’च्या गर्तेने व्यापली असून भंगारमालाचा “अड्डाच’ बनले आहे. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे. कार्यालयाच्या आवारात सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा विसरच पडला आहे. फायर व स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी अद्याप मुहूर्तच लागलेला नाही.
विद्या प्राधिकरण हा शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा विभाग मानला जातो. ही राज्याची प्रशिक्षणाची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. शिक्षकांना प्रशिक्षण देणे, अभ्यासक्रम तयार करणे, शैक्षणिक गुणवत्तासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करणे आदी महत्त्वाची कामे या विभागामार्फत चालतात. विद्या प्राधिकरणाला रॉयल्टी देण्याच्या बदल्यात बालभारतीकडून निविदा मागवून हे सुशोभिकरणाचे काम करून देण्यात आले. यासाठी सुमारे 14 कोटी रुपये खर्च केला. हे काम मागील दोन-अडीच वर्षांपासून सुरू होते. कार्यालयातील अंतर्गत सजावट करण्यात आली. मात्र, बाहेरच्या आवारात सुशोभिकरणाची कामे झालीच नाहीत. त्यामुळे विद्या प्राधिकरणाचा आवार हा विचित्र दिसू लागला आहे. या सुशोभिकरणाच्या कामकाजावर सर्व नियंत्रण हे बालभारतीचे होते.
या कार्यालयाच्या सुभोभिकरण कामाच्या दर्जाबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून आरडाओरड सुरू आहे. कार्यालयातील सभागृहातील फरशा, प्लायवूड उचकटले असून पंखे बंद आहेत. फर्निचरची दुरवस्था झाली आहे. वातानुकुलित यंत्रणा फारशी पुढे बसविलेली आढळत नाही. कोट्यवधी रुपयांच्या तुलनेत कामे मात्र फारशी काहीच दिसत नाहीत, असे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे.
अतिथी भवनात काही महिन्यांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. यात जळालेले साहित्यही जागेवरच पडलेले आहे. जूनी लोखंडी कपाटे, लाकडी फर्निचर व इतर साहित्य वापरण्याजोगे नसल्याने ते आवारातच पडून आहेत. वर्षानुवर्ष काही भंगार गाड्याही धूळखात पडल्या आहेत. कार्यालय आवारात कुठेही पाहिले तरी घाणीचे साम्राज्य दिसून येते.
या समस्यांनी ग्रासले
*व्हर्च्युअल क्लासरुम
*स्टुडिओ धूळखात पडलाय
*अतिथी भवन, पुरुष
*वसतिगृह भकास बनलेय
*पिण्यासाठी पुरेसे
*पाणीही मिळेना
*ग्रंथालयाची विदारक अवस्था
*सीमाभिंतीचे भगदाड वाढतेय
*आवारात नियमित
*स्वच्छताच दिसेना
*सुभोभिकरणाच्या कामाचा
*दर्जा तपासायला हवा
*कार्यालयाला नावाची
*पाटीच दिसेना
*सुशोभीकरणातून
*काही कामे गायब