कात्रज – मशिदींवरील भोंगे काढण्यासाठीच्या प्रकरणातून पोलीस अनेक ठिकाणी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड करीत असताना मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि नेते वसंत मोरे हे दोघेही “नॉट रिचेबल’ असल्याने त्यांना अटक झाली, त्यांनी पक्ष सोडला… अशा वावड्या उठल्या होत्या. हे दोघेही नॉट रिचेबल असल्याने तर्क-वितर्क लढविले जात होते, अशातच वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट करीत आपण तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी आल्याचे स्पष्ट केल्यानंतर चर्चेच्या वावड्या थांबल्या.
मनसेकडून भोंगे उतरविण्याचे आंदोलन केले जात असताना मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे हे पुण्यात नव्हते. याबाबत त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपला पूर्व नियोजित कार्यक्रम असल्याने तिरुपती बालाजीला आलो आहे. सध्या मी पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय, साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मशिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली. नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे सांगितले. माझ्या प्रभागातील सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार! असं वसंत मोरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. आपण, तिरुपती बालाजीला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या विरोधात जाहीर भूमिका वसंत मोरे यांनी घेतली, त्यानंतर त्यांचे शहराध्यक्ष पद काढून घेण्यात आले. तर त्यांचेच जवळचे स्नेही साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्ष पद सोपविण्यात आले. या दोघांच्या वॉर्डामध्ये मुस्लीम मतदार अधिक आहेत. राज यांच्या अल्टिमेटमनंतर पुण्यात अनेक मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. परंतु यामध्ये शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरे दिसले नाहीत. त्या दोघांचे फोन देखील स्वीच ऑफ होते. हे दोघे नॉट रिचेबल असल्याने शहरात सर्वत्र विविध वावड्या उठल्या होत्या.