पुणे – केंद्र आणि राज्य सरकारकडून सातत्याने बदलल्या जाणाऱ्या नियमांमुळे लसीकरण मोहिमेतील सावळा गोंधळ बुधवारीही सुरूच राहिला. यामुळे लसीकरण केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना नागरिकांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.
लस उपलब्ध नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून शहरातील लसीकरण मोहीम ठप्प होती. मंगळवारी साडेसात हजार कोविशिल्ड आणि अडीच हजार कोवॅक्सिन लसींचा पुरवठा झाला. यामुळे शहरातील लसीकरण बुधवारी पुन्हा सुरू झाले. सुमारे 7 हजार 400 लसींचे नियोजन करण्यात आले होते.
परंतु, केंद्र आणि राज्य सरकारकडून लसीकरणासंदर्भात नियमांत बदल केल्याचा परिणाम पहिल्याच दिवशी दिसून आला. पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसानंतरच दुसरा डोस देण्यात यावा, असे आदेश महापालिकेला मिळाल्याने तशा सूचना सर्व लसीकरण केंद्रांना देण्यात आल्या. परंतु या नियमांत अनेक नागरिक बसत नसल्याने केंद्र ओस पडली.
काही ठिकाणी लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आरडाओरडा पण केला अनेकांनी परंतु, वरील नियमांत ते बसत नसल्याने त्यांना घरचा रस्ता धरावा लागला.
दुपारी तीन नंतर 45 वर्षे वयापुढील नागरिकांना डोस देण्याचे तोंडी आदेश देण्यात आल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ज्यांना डोस दिले, त्यांची नावे ऑफलाइन नोंदवल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु प्रशासनाने ऍपमध्येच नावे नोंदवता येत नाहीत, त्यामुळे तसे करता येत नाही असे उत्तर दिले.
आयुक्तांच्या आदेशांचेही पडसाद
लसीकरण केंद्रात होणारा राजकीय हस्तक्षेप दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी काढलेल्या आदेशाचे पडसाद नगरसेवकांमध्ये उमटले आहे. तर मनसेने आयुक्तांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्याने लसीकरण केंद्रावरील फ्लेक्स काढले गेल्याचा दावा केला.
तसेच चुकीच्या गोष्टींचे समर्थन कोणीच करणार नाही, परंतु लसीकरण केंद्रातील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मदत म्हणून काही कार्यकर्ते काम करतात. नागरिकांना पाण्याच्या बाटल्या, चहा, बिस्कीट काही जण देतात याचा देखील सकारात्मकपणे विचार केला पाहीजे. लसीकरण केंद्रांत विनाकारण येणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा नियम हा थोडा जास्तच कडक असल्याचे पदाधिकाऱ्याने नमूद केले.
सध्या असलेली गोंधळाची परिस्थितीबाबत महापालिकेने राज्याच्या आरोग्य प्रमुखांशी समन्वय साधून लसीबाबतचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी केली आहे. दुपारनंतर तोंडी आदेश देऊन 45 वर्षे वयापुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर
बुधवारी लसीकरणाचे प्रमाण कमी झाले. बहुतेक लसीकरण केंद्रे रिकामी होती. यातूनही मार्ग काढण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडे वस्तुस्थिती कळवण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्याचा निर्णय झाला आहे. 45 वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस देण्यास परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर