जलसंपदा विभागाचा पालिकेला धमकीवजा इशारा
12 ते 16 एप्रिलदरम्यान जास्त पाणी उचलले
दररोज 1,350 एमएलडी पाण्याचा वापर करा
जिल्ह्यातील सिंचनावर परिणाम होण्याची शक्यता
पुणे – “वारंवार सूचना देऊनही महापालिकेकडून दरदिवशी मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलले जात आहे. त्यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी 15 जुलैपर्यंत करण्यात आलेले पाण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची जबाबदारी सर्वस्वी महापालिकेची असेल,’ असा धमकीवजा इशारा पुन्हा एकदा जलसंपदा विभागाने महापालिकेस पत्राद्वारे दिला आहे. तसेच “कालवा समितीच्या बैठकीत निश्चित केल्याप्रमाणेच पालिकेने दररोज 1,350 एमएलडी पाण्याचा वापर करावा,’ अशाही सूचना पत्राद्वारे पालिकेस करण्यात आल्या आहेत.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यात सिंचन तसेच शहराच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले असून पालिकेस दररोज 1,350 एमएलडी पाणी निश्चित करण्यात आले आहे. मात्र, 12 ते 16 एप्रिल या कालावधीत महापालिकेने प्रतीदिन 1,400 ते 1,450 एमएलडी पाणी धरणातून उचलले आहे. हे पाहता महापालिका मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी घेत असून त्याच परिणाम 12 एप्रिलपासून जिल्ह्यातील सिंचनासाठी करण्यात येणाऱ्या पाण्यावर होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने तातडीने पाणी वापर नियंत्रित करावा, अशी मागणी जलसंपदा विभागाने केली आहे. तसेच या जादा पाणी वापरामुळे शेतकऱ्यांना सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत वादाची स्थिती उद्भवल्यास अथवा असंतोष पसरल्यास त्यास महापालिका सर्वस्वी जबाबदार असे असा इशाराही जलसंपदा विभागाने दिला आहे.