पुणे – बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे लक्ष पदवी प्रथम वर्ष प्रवेशाकडे लक्ष लागले आहे. पदवी प्रवेशासाठी सीईटी घेण्याबाबत राज्य शासनाकडून कार्यवाही झालेली नाही. यंदा पदवी प्रवेशासाठी सीईटी होण्याविषयी साशंकता आहे. मात्र, विद्यापीठाने 10 टक्केऐवजी 20 टक्के प्रवेशाचा कोटा वाढवून दिल्यास इच्छुकांना प्रवेश मिळणे शक्य होणार असल्याची प्रतिक्रिया प्राचार्यांतून व्यक्त होत आहे.
बारावीचा यंदा सर्वाधिक 99.63 टक्के इतका लागला आहे. त्यामुळे सर्वांना प्रवेशासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आव्हान उच्च शिक्षण विभागापुढे उभे आहे. सध्याची उत्तीर्णांची संख्या आणि उपलब्ध जागा पाहता प्रवेशाची क्षमता वाढविणे हाच पर्याय आहे. तुकडी वाढीस मंजुरी मिळण्याची प्रक्रिया दिरंगाईची आहे. त्यामुळे सर्वांना प्रवेशासाठी जागा उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
यासंदर्भात गणेशखिंडच्या मॉडर्न हायस्कूलचे प्राचार्य डॉ. संजय खरात म्हणाले, “यंदा बारावी उत्तीर्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रवेशाची तितक्याच जागा उपलब्ध नाहीत. त्याचा विचार करून यंदा विद्यापीठाने जवळपास 20 टक्के प्रवेशाची क्षमता वाढवून देण्यास मान्यता दिल्यास प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार नाही. शासनाच्या नियमानुसार सर्व प्रवेशप्रक्रिया केल्या जातील. काही महाविद्यालयाने मेरिट फार्म भरून घेण्यास सुरुवात केली आहे.’
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार कार्यवाही केली जाणार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे प्रवेशासाठी राज्य शासनाकडून काय नियमावली अथवा निर्णय घेतला जाणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुकडीवाढ देण्यास शासन सकारात्मक?
बारावीच्या निकालाची आकडेवारी पाहता सर्वांना पदवी प्रथम वर्ष प्रवेश मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून महाविद्यालयांना वाढीव तुकड्यांना मान्यता देण्यासाठी सकारात्मक असल्याचे दिसून येते. तसेच सध्याची स्थिती पाहता पदवी प्रवेशासाठी सीईटी होणार नाही. यासंदर्भात उद्या सर्व कुलगुरूंची उच्च व शिक्षणमंत्री उदय सामंत बैठक घेणार आहेत. त्यात पदवी प्रवेशावर निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.