पुणे- राज्यात करोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असून, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या यापुढच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय काही दिवसांत घेतला जाणार असल्याचे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. त्यामुळे आता विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. आता राज्यासह देशभरात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. यापूर्वीच विविध शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या यंदाच्या वर्षीच्या पहिल्या सत्राची परीक्षा ऑफलाइन घ्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, पहिल्या सत्राच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत आहे. आता मात्र पुढची सत्र परीक्षा ऑफलाइन होणार असल्याची चिन्हे आहेत.
उदय सामंत यांनी रविवारी एका कार्यक्रमात ऑफलाइन परीक्षेसंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. सध्या करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे आता ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय येत्या काही दिवसांत घेतले जाणार असल्याचे कार्यक्रमात सांगितले. एवढेच नव्हे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेसाठी सज्ज राहावे, असेही आवाहन केले आहे. त्यावरून आता ऑफलाइन परीक्षांचा निर्णय लवकरच उच्च शिक्षण विभागाकडून जाहीर
होणार असल्याचे संकेत मिळत आहे. या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.