पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू केल्यानंतर चौकात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पर्यायी वाहतूक आराखडा “पीएमआरडीए’ने तयार केला आहे. त्यावर पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण अर्थात “पुम्टा’च्या बैठकीत चर्चा झाली.
महापालिका आणि वाहतूक पोलीस यांनी प्रत्यक्षात आराखड्यानुसार पाहणी करावी. त्या आवश्यक काय बदल असतील, ते करावेत. आवश्यक असतील तर ते अडथळे दूर करावे, आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांची रुंदी वाढावी, याबाबतचा निर्णय घ्यावा. त्यानुसार ही कामे तातडीने संबधित विभागाने मार्गी लावावेत, असा निर्णय “पुम्टा’च्या बैठकीत घेण्यात आला आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. संपूर्ण एलिव्हेटेड असणाऱ्या या प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचा अडथळा ठरत होता. दरम्यान, लॉकडाऊन काळात पीएमआरडीएने हा उड्डाणपूल पाडला. मात्र, अद्यापही या पुलाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालकांना सहन करावे लागत आहे.
मागील आठवड्यात पालकमंत्री अजित पवार यांनी देखील पुलाचे काम सुरू न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच कोणत्याही परिस्थीतीमध्ये दिवसाळीनंतर या पुलाचे काम सुरू करणार असे जाहीर केले होते. दरम्यान, पालकमंत्र्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी “पुम्टा’ समितीची बैठक झाली. या बैठकीला पीएमआरडीए, वाहतूक पोलीस, महापालिका यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत उड्डाणपुलाच्या कामासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्थेवर चर्चा होऊन नियोजन करण्यात आले.