मुंढवा – मुंढवा-केशवनगरला गुन्हेगारीचे ग्रहण लागलेले असतान ग्रामस्थ रविंद्र दिगंबर गायकवाड (वय 59) यांच्या खून प्रकरणानंतर परिसरात दहशतीचे वातवरण निर्माण झाले होते. यासाठी मुंढवा-केशवनगर कृती समितीने पुढाकार घेत लोणकर विद्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. याचे गांभीर्य ओळखत विद्यमान आमदारांसह तीन माजी आमदार उपस्थित होते. याप्रश्नी एकत्रित लढा देण्यासाठी आजी-माजी आमदार एकत्र आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
मुंढवा पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या उपायोजनां संदर्भात सदानंद कोद्रे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सदानंद कोद्रे, समीर कोद्रे, अजित गायकवाड, साहेबराव लोणकर, डॉ. दादा कोद्रे, कैलासभाऊ कोद्रे, देविदास लोणकर, किशोर धायरकर, राजशेखर गायकवाड, सचिन निवंगुणे, जितीन कांबळे, विक्रम लोणकर, रमेश राऊत, लक्ष्मण कोद्रे, युवराज गायकवाड, शैलेंद्र कोद्रे आदी उपस्थित होते.
पोलीस खाते अपयशी ठरत असेल तर राज्यकर्त्यांनी शासन दरबारी हे प्रश्न मांडलेच पाहिजे. पोलिसांच्या समस्याही मांडल्या गेल्या पाहिजेत. पोलिसांच्या हातात सर्वकाही आहे. परंतु, त्यांच्या हातात तशी “पॉवर’ देणे गरजेचे आहे.
– महादेव बाबर, माजी आमदार
पोलीस खाते सक्रीय राहणे गरजेचे आहे. कृती समितीतही सातत्य राहणे गरजेचे आहे. यापुढे पोलिसांनी हलगर्जी केली तर ही कृती समिती पुन्हा रस्त्यावर उतरेल, आम्ही या कृती समितीच्या पाठीशी आहोत.
– योगेश टिळेकर, माजी आमदार
अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. गांजाचे व्यसन करणारे वाढत आहेत. हुक्का पार्लरवर कारवाई झाली पाहिजे. अट्टल गुन्हेगारांवर मोका लावला पाहिजे. या वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा घातला पाहिजे.
– बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार