पुणे –पर्वतीहून लष्कर जलकेंद्राला पाणीपुरवठा करणारी 5 फूट व्यासाची जलवाहिनी फुटली होती. तिची दुरुस्ती होण्यास आणखी दोन ते तीन दिवस लागणार आहेत. येथील सुमारे दहा फुटांची पूर्ण जलवाहिनी बदलण्यात येणार असून, ती गुरुवारी सायंकाळपर्यंत जोडण्यात येणार आहे. त्यानंतरच येथून पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.
या जलवाहिनीद्वारे पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्रास पाणीपुरवठा केला जातो. त्याचे लष्कर केंद्रात शुद्धीकरण करून ते हडपसर तसेच नगर रस्ता परिसरास दिले जाते. शुक्रवारी रात्री ही जलवाहिनी फुटली. त्यामुळे लष्कर पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मात्र, महापालिकेने नगर रस्ता परिसरासाठी भामा- आसखेड प्रकल्पातून तर लष्कर जलकेंद्रासाठी नवीन मुठा कालव्याद्वारे पाणी घेतले आहे. यासाठी पाटबंधारे विभागाकडून खडकवासला धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे तूर्तास पालिकेने शहरातील पाणी पुरवठा सुरळीत केला असला, तरी प्रत्यक्षात जलवाहिनी दुरुस्तीसाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत.
ऐन दिवाळीत गैरसोय
ही जलवाहिनी फुटल्याने जवळपास 6 लाख नागरिकांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे या नागरिकांना ऐन दिवाळीत पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिकेकडून तूर्तास पाणी पुरवठा सुरळीत केल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अनेक भागांत कमी दाबाने तसेच कमी वेळ पाणी येत आहे. त्यामुळे ऐण सणासुदीत नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.