पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भयभीत झालेल्या पर्यटकांची घरी परत येण्यासाठी धडपड सुरू होती. त्यामुळे झेलम एक्स्प्रेसने दोनशे पर्यटक पुण्यात परतले. त्या वेळी नातेवाईकांनी पर्यटकांचे स्वागत केले, तर कुटुंबीय सुखरूप घरी आल्याने काहींच्या डोळे पाणावले होते.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्यांमध्ये दहशत निर्माण झाली. पावसामुळे रामबन श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला होता. त्यामुळे अनेक पर्यटक अडकून पडले होते. अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष विमानाची सोय केली होती. त्यापैकी पहिले विशेष विमान गुरूवारी आले होते, तर दुसरे विमान शुक्रवारी आले.
पुण्यातील अनेक पर्यटकांचे जम्मू तावी एक्सप्रेसचे बुकिंग होते. ते पर्यटक झेलम एक्स्प्रेसने आता पुण्यात दाखल झाले आहेत. शहरात परतल्यानंतर सर्वच प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यांना घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना पाहून काहींना रडूही कोसळले.