जिल्हाधिकारी नवकिशोर राम यांची माहिती…
राजगुरूनगर(प्रतिनिधी) : करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या वर्षी पावसाळ्यात सर्व धरण क्षेत्रात पर्यटन बंदी घालण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.
खेड तालुक्यातील करोना संसर्ग स्थिती, त्यात येऊ घातलेला पावसाळा आणि उपाय योजना यावर खेड पंचायत समिती येथे मंगळवारी(दि ९) आयोजित बैठकीत नवलकिशोर राम बोलत होते. ते पुढे म्हणाले,
पावसाळ्यात दमट हवामान असणार आहे. याकाळात नेहमीप्रमाणे साथीचे थंडी, तापाचे आजार वाढणार आहेत. मात्र कोरोनाची स्थिती असल्यामुळे याकडे अधिक लक्ष आणि उपचारासाठी प्रशासकीय तयारी ठेवावी. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वयंशिस्त आणि जनजागृतीवर भर द्यावा अशा सूचना प्रशासनाला नवलकिशोर राम यांनी दिल्या.
मोठ्या धरणांच्या क्षेत्रामध्ये विविध उपाय योजना केल्या जातात. तुलनेने लहान पाणीसाठा असलेल्या पाणी साठ्याकडे दुर्लक्ष होते. याच लहान-मोठ्या पाणी साठ्यांच्या दुर्घटनेत नंतर मोठा धोका होतो. याबाबत प्रशासनाने काळजी घ्यावी. करोना आजाराच्या माध्यमातून रुग्णाना भीती दाखवून ॲडव्हान्स किंवा जास्त रक्कम आकारणाऱ्या डॉक्टर, रुग्णालयावर कडक कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.
ग्रामीण भागातील तळागाळातील कोरोना संबंधित जनजागृती करण्यासाठी स्थानिक स्तरावर कोरोना योद्धा कमिटी स्थापन कराव्यात असेही सुचविले.
पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात मोठी कारखानदारी आहे. रोजंदारी वाढविण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हे कारखाने बंद होणार नाहीत याची काळजी प्रशासनाने घ्यावी आशा सूचना श्री राम यांनी दिल्या.प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त स्मिता पाटील व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.