जिल्ह्यात खासगी वाहनांची गर्दी वाढली ः पर्यटकांची मात्र निराशाच
मिलन म्हेत्रे
पुणे – राज्यात 2 सप्टेंबरपासून ई-पासची सक्ती रद्द करण्यात आली आहे. 24 मार्च पासून राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आणि त्यानंतर जिल्हाबंदी करण्यात आली होती. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात विना ई-पास जाणे दुरापास्त झाले होते; मात्र गेल्या आठवड्यात ही बंदी उठवण्यात आली आणि पाच महिन्यांपासून ओस पडलेले टोलनाके पुन्हा गजबजू लागले. पुणे जिल्ह्यातून साताऱ्याकडे जाणारा खेड शिवापूर, नाशिक-पुणे, मुंबई मार्गावर आणि नगर, सोलापूरकडे जाणाऱ्या टोल नाक्यावरील वाहनांच्या रांगांत आता लक्षणीय वाढ होऊ लागली आहे.
जिल्हा बंदी उठवली असली तरी पर्यटन आणि तीर्थक्षेत्रे अजूनही बंदच आहेत, त्यामुळे पर्यटनाला किंवा देवदर्शनाला, यात्रा उत्सवांना जाणाऱ्यांची गर्दी सध्या तरी दिसत नाही; मात्र देवस्थाने आणि पर्यटन स्थळांवरील बंदी उठवली तर हे टोलनाके पूर्ण क्षमतेने लवकरच सुरू होतील, असे चित्र आता दिसू लागले आहे.
महामंडळाच्याबसची संख्या कमी
गावाकडे जाण्यासाठी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी नागरिक खासगी गाड्यांना प्राधान्य देत आहेत, त्यामुळे महामंडळाच्या एसटी बसला तुलनेने पसंती कमी आहे. या गाड्या लॉकडाऊनच्या आधीच्या काळापेक्षा कमी प्रमाण आहे, तसेच खासगी बसगाड्यांनाही अजून प्रवाशांची फारशी पसंती दिसत नाही.
मोशी टोल नाक्यावर प्रत्येक कर्मचाऱ्याची थर्मल आणि ऑक्सिजन चाचणी केली जात आहे. या ठिकाणी शिफ्टनुसार 60 कर्मचारी आहेत. या सगळ्यांची टोल प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची आजपर्यंत तरी लक्षणे आढळलेली नाहीत.
-धनंजय पणशीकर, प्रोजेक्ट मॅनेजर मोशी
पाटस टोल प्लाझावरील सगळ्या कर्मचाऱ्यांना हॅण्डग्लोज, मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. त्यांना सॅनिटायझर दिले जाते आहे. कामावर आल्यावर घरी जाईपर्यंत प्रत्येक दोन तासांनी या सर्व कर्मचाऱ्यांची थर्मल आणि ऑक्सिजन क्षमता यांची नोंद केली जात आहे.
-वैभव चव्हाण, जनसंपर्क अधिकारी पाटस टोलनाका
राज्यात अनलॉकप्रक्रिया सुरू झाल्यावर 2 सप्टेंबरनंतर आता खेड-शिवापूर टोलनाक्यावर जवळपास स्थिती पूर्ववत येत आहे. लॉकडाऊनच्या आधीच्या काळात सातारा-महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांची सातत्याने या टोलनाक्यावर गर्दी होत असे; पण सध्या या भागातील पर्यटनस्थळे अजूनही बंद असल्याने पर्यटकांची गर्दी या भागात नाही.
-भानुविलास शर्मा, सिनिअर मॅनेजर खेड शिवापूर
कर्मचाऱ्यांची सुरक्षितता नियमानुसार
टोलनाक्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची करोनाच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने कसरत होत आहे. गावोगावी जाणाऱ्या प्रवाशांकडून टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करोना लागण होऊ नये, यासाठी काळजी टोल प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. या कर्मचाऱ्यांना हॅण्डग्लोज, मास्क, सॅनिटायझर घालणे अनिवार्य आहे. कामावर येताना आणि घरी जाताना या कर्मचाऱ्यांचे थर्मल टेम्परेचर, ऑक्सिजन क्षमता यांची चाचणी केली जात आहे. याचबरोबर त्यांना इतर काही आजार नाही ना याबाबतही काळजी घेतली जात आहे.
फास्टॅगसह कॅशलाइन सेवाही सुरू
टोल नाक्यांवरील खासगी आणि इतर गाड्यांची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू झाली आहे, तरी देखील खासगी वाहनांचे प्रमाण अधिक आहे. फास्टटॅगचा वापरही चांगल्या पद्धतीने आहे; पण अनेक ठिकाणी फास्टटॅगसाठी रिचार्जिंगची समस्या निर्माण होत आहे, अशावेळी कॅशलाइन वाढवून प्रवाशांना मदत केली जात आहे.
बाजाराच्या दिवशी गर्दीत वाढ
अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर जात आहेत. याबरोबरच बाजारच्या दिवसाचे औचित्य साधून त्यानुसार भाज्यांच्या-धान्यांच्या गाड्यांची संख्या कमी-जास्त होते आहे. रविवार, गुरुवार, मंगळवार हे साधारण बाजारचे दिवस ग्रामीण भागात असतात. यावेळी सकाळ-संध्याकाळ टोलनाक्यावर या गाड्यांची संख्या आढळते.
…कामगारांची घरी जाण्याची लगबग
गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हा बंदी असल्याने अनेक कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबांना आपापल्या गावी जाता आलेले नाही. आता जिल्हा बंदी उठवल्यामुळे आणि ई-पासची सक्ती रद्द केल्याने महानगरांतील कामगारवर्ग सुटीच्या दिवशी आपल्या गावाकडे जात आहे. त्यामुळे शुक्रवारी किंवा शनिवारी टोल नाक्यांवर गर्दी वाढली आहे. त्याचप्रमाणे सोमवारी कामाच्या ठिकाणी परतायचे असल्याने रविवारी संध्याकाळी टोलनाके पुन्हा गजबजू लागले आहेत.