पुणे, दि. 23 (विजयकुमार कुलकर्णी ) – मार्केट यार्डात शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि फसवणूक होऊ नये, यासाठी बाजार समिती प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. बाजार घटकातील कोणीही त्रास दिल्यास अथवा बिलाची पावती देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची माहिती त्वरित बाजार समिती प्रशासनाला देता येणार आहे. यासाठी नुकताच टोल क्रमांक सुरू केला आहे.
फळे आणि भाजीपाला विभागात प्रत्येक पाकळीमध्ये हा टोल क्रमांक लावण्यात आला आहे. याबरोबरच “काम केले तरच दाम’ यासह विविध आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. यातून शेतकऱ्यांमध्ये जागृती होण्यास मदत होणार आहे.
बाजार समिती शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत असते. अनेकांची अडकलेले पैसे काढून दिल्याचे उदाहरणे आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना बाजार आवारातील डमी आडत्यांनी अधिकृत बिल न देता व्हॉट्स ऍपवर बिल दिल्याचे आणि पैसे देण्याचे टाळाटाळ केल्याचे उघड झाले होते. त्याच्या तक्रारी बाजार समितीकडे आल्या आहेत. असेही फसवणुकीचे प्रकार झाल्यास कोठे तक्रार करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण होते. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने पुढाकार घेऊन टोल क्रमांक सुरू केला आहे. टोल फ्री नंबर : 94941-50202
शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीने हा टोल क्रमांक सुरू केला आहे. तोंडी तक्रारीसह फसवणूक करणाऱ्या व्यक्ती अथवा गाळ्याचा फोटोदेखील यावर अपलोड करता येणार आहे. प्रशासनाकडून याची त्वरित दखल घेऊन कारवाई केली जाईल.
– मधुकांत गरड, प्रशासक, बाजार समिती, पुणे