पुणे – आमच्या कुटुंबाचा आधारच गेला. आता वडील आमच्यात नाहीत, असे…म्हणताच आसावरीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या. हा क्षण हृदय पिळवटून टाकणारा होता. माझ्या डोळ्यांसमोर वडिलांना गोळ्या झाडल्या. ज्या क्रूरतेने त्यांना मारले, त्यावरून ते राक्षस आहेत, त्यांना सोडू नका, सरकारने कडक कारवाई, अशी शब्दात असावरीने संताप व्यक्त केला.
पहलगाम येथे दहशतवादी हल्यात मृत पावलेल्या संतोष जगदाळे यांच्या मुलीशी संवाद साधला असता, ती म्हणाली आम्ही आणि आमच्याबरोबर असलेले गनबोटे काका हिरवळीवर झोपले होते. त्या वेळी फोटो काढत असताना फायरिंगचा आवाज आल्याने आम्ही तिथल्या लोकल व्यक्तींना विचारले हा आवाज कसला? तर त्यांनी शेर आता है तो ऐसा करते, असे सांगितल्यामुळे आम्ही निवांत बसलो होतो.
मात्र, काही वेळातच दहशतवादी आमच्या इथे आले, वडिलांना कलमा येतो का, असे विचारले आणि त्यांवर गोळ्या झाडल्या. कौस्तुभ काकांवरही गोळ्या झाडल्या. आम्ही घाबरलो, जीवाच्या अंकाताने ओरडत होतो. वडील आणि काका रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
त्या वेळी एका घोडेवाल्याने आम्हाला मदत करत सुखरूप खाली आणले. त्या घोडेवाल्याला समजले, की आमच्या कुटुंबातले दोघे पुरुष गेले आणि फक्त आम्ही तिघी स्त्रिया उरलोय. मात्र, तो पळून गेला नाही. उलट म्हणाला, मॅडम, आप हमारी सवारी हैं, हम आपको लेकर जाएंगे.’
माझी आई पडल्यामुळे तिला लागले. अशा परिस्थितीत घोडेवाल्याने त्यांना उचलून घोड्यावर बसविले आणि आमच्या गाडीजवळ घेऊन आले. पहिल्याच दिवसापासून आमच्यासोबत असलेला ड्रायव्हरने आम्हाला धीर दिला, मदत केली. तो आजारी असतानाही आम्हाला सोडून न जाता विमानतळापर्यंत बरोबर होता. हल्ल्यानंतर त्यांना लष्कर आणि स्थानिक प्रशासनाचा आधारही मिळाला.