पुणे – राज्य आणि केंद्र सरकारने अद्यापही औषध विक्रेत्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा दिलेला नाही. त्याचे लसीकरणही झाले नाही, त्यामुळे आमचे लसीकरण केव्हा, असा सवाल करीत औषध विक्री बंद करण्याचा इशारा विक्रेत्यांनी दिला आहे.
औषध विक्रेता व तेथील कर्मचारी हे आपल्या जीवावर उदार होऊन 24 तास सेवा देत आहेत. त्यामुळेच संपूर्ण देशासह महाराष्ट्रात औषध पुरवठा सुरळीत आहे. औषधी विक्रेत्यांचा प्रत्यक्ष संबंध रुग्णांशी तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांशी जवळून येतो. डॉक्टर आणि नर्सेसनंतर कोविड योद्धा म्हणून औषधी विक्रेते काम करत आहेत.
मात्र, सरकारचे या विक्रेत्यांकडे दुर्लक्ष आहे. महाराष्ट्रासह देशात 200 पेक्षा अधिक औषध विक्रेते करोनाच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडले आहेत. एक हजारांहून अधिक विक्रेते, त्यांचे नातेवाईक बाधित झालेले आहेत. तरीही केंद्र व राज्य सरकारने कोविड योद्धा म्हणून सन्मान दिलेला नाही. विशेष म्हणजे लसीकरणातही प्राधान्य दिलेले नाही, असे सांगून अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी खंत व्यक्त केली.
राज्य आणि केंद्र सरकारला वेळोवेळी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, त्याची दाखल सरकारने घेतली नाही. त्यामुळे संघटनेला संपूर्ण लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊन व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. याची सरकारने गंभीर दखल घ्यावी.
– जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष, अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य संघटना, औषध विक्रेते