“माझी रिक्षा-सुरक्षित रिक्षा’ योजना : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली थाप
पुणे – रिक्षा सेवा देताना गणवेश महत्त्वाचा आहे. चालकांनी तो परिधान करणे गरजेचे आहे. रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करून सेवा दिल्यास त्यांचे कौतूकच होईल, अशा शब्दांत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रिक्षाचालकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटनेत एका रिक्षाचालकाचा सहभाग आढळल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र, सगळेच चालक तसे नाहीत. नियम पाळून चांगली सेवा देणाऱ्या चालकांसाठी लष्कर पोलिसांनी “माझी रिक्षा-सुरक्षित रिक्षा’ योजना राबवली.
यामध्ये सर्वोत्तम सेवा देणाऱ्या चालकांना रोख रक्कम, पुष्पगुच्छ देऊन गुप्ता यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गुप्ता म्हणाले, “रिक्षाचालकांसाठी लष्कर पोलीस ठाण्याने चांगला उपक्रम हाती घेतला आहे. योजनेत सहभागी झालेल्या रिक्षाचालकांबाबत नागरिकांचे अभिप्राय येत असून चांगली सेवा देणाऱ्यांचे कौतुक होते. हा उपक्रम शहर पातळीवरदेखील राबवला जाईल. चालकांनी नियमांचे पालन करण्याची गरज असून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.’
लष्कर पोलिसांची आता सायकलवरून गस्त
लष्कर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आता हद्दीमध्ये सायकलवरून गस्त घालणार आहेत. शहर पोलीस दलातील समर्थ पोलिसांनतर आता लष्कर पोलिसांच्या ताफ्यात सायकल दाखल झाल्या आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या उपस्थितील शनिवारपासून ही योजना सुरू करण्यात आली.
सर्वसामान्य नागरिकांना चांगली सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांचा गौरव व्हावा, या उद्देशातून “माझी रिक्षा-सुरक्षित रिक्षा’ योजना राबविण्यात आली. स्थानिक लोकांच्या सहकार्यातून योजना चांगला प्रतिसाद मिळाला.
अशोक कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस ठाणे