माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वपक्षाला खडेबोल
पुणे – सर्व समविचारी राजकीय पक्षांना एकजूट करण्याची गरज आहे. त्यासाठी कॉंग्रेसने पुढाकार घ्यावा. देशात पर्यायी विरोधी पक्ष उभा करण्याची जबाबदारी कॉंग्रेसची आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्याच पक्षाला खडेबोल सुनावले. आता कॉंग्रेस पक्षाने लोकशाही बळकट करून नेतृत्व करायची भूमिका घेतली नाही, तर पुढील प्रवास खडतर असून त्याची चिंता वाटते, असेही चव्हाण म्हणाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्या विद्यमाने डॉ. श्रीपाल सबनीस लिखित “डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रणित सामाजिक क्रांती’ ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी झाले. यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, तसेच सचिन ईटकर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, संपूर्ण देशात चातुवर्ण्य व्यवस्था येतोय की काय, अशी भीती वाटत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक समतेवर आधारित चळवळ उभी करावी लागणार आहे. बाबासाहेबांनी विचारांची लढाई लढविली आणि त्यातून समाज क्रांती झाली. आता तरुण पिढीला आत्मचिंतन करण्याची गरज असून विचारांचे शस्त्र घेऊन उभे राहिले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय खरे यांनी केले.