करोना, लॉकडाऊनमुळे प्रयोग बंद असल्याने नाट्यक्षेत्र अडचणीत
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. पुणे शहर आणि नाट्यप्रयोग असे समीकरण अनेक काळापासून प्रचलित आहे. मात्र, मागील वर्षात नाट्य क्षेत्राचे अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी काळात नियमावलीसह नाटकांचे प्रयोग करण्यासाठी परवानगी मिळण्याची गरज नाट्यक्षेत्राकडून व्यक्त होत आहे.
सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यात दररोज नाटक, संगीत, नृत्य, मुलाखत, लोककला आदी कलाप्रकारांतील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. विशेषत: विविध नाट्यप्रयोगही येथील खास बाब मानली जाते. मात्र, करोना आणि लॉकडाऊनमुळे नाटकांवर परिणाम झाला असून, आर्थिक नुकसानीबरोबर आगामी प्रकल्पदेखील रखडले आहेत.
नाटकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक तंत्रज्ञांनी अन्य व्यवसायांचा पर्याय निवडला आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी नव्या नाटकांच्या प्रदर्शनांचे नियोजन करून नाटकांच्या लेखनाची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, अद्यापही नाटकांवर निर्बंध असल्याने निर्मिती प्रक्रिया रखडली आहे.
शहरात दर महिन्याला नाटकांचे सुमारे 100 हून अधिक प्रयोग होतात. पहिल्या लॉकडाऊननंतर काही नाटकांचे प्रयोग झाले. मात्र, ते 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत झाले होते. याशिवाय, अपेक्षित प्रतिसाददेखील त्यादरम्यान नव्हता. त्यामुळे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळणे गरजेचे आहे, असे मत नाट्य परिषदच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केले.
महानाट्यांना अधिक फटका
करोनाचा अधिक फटका महानाट्यांना बसला आहे. ही महानाट्ये हत्ती, घोडे, उंट, बैलगाड्या यांसह सुमारे शंभर ते दीडशे कलाकारांच्या संचात सादर करण्यात येतात. याशिवाय नेपथ्य, ध्वनी, वेशभूषा आदी या नाट्यांवर अवलंबून असतात. अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांचा संपूर्ण परिवार नाटकांच्या प्रयोगांवर अवलंबून असल्याने या घटकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, दिग्दर्शक, निर्माते आजही मदतीपासून वंचित आहेत.
महानाट्यांचे प्रयोग खुल्या मैदानात सादर होत असल्याने ते पावसाळ्यादरम्यान सादर करणे शक्य नसते. काटेकोर नियोजन आणि अंतराच्या नियमांचे पालन करून या कलाप्रकाराला शासनाने सुयोग्य नियमावलीसह परवानगी देण्याची आणि यातील घटकांना आर्थिक मदत करण्याची शासनाला विनंती केली असल्याचे शिवायन महानाट्याचे लेखक, दिग्दर्शक सात्विक ठकार आणि निर्माते, अभिनेते मयूर घोलप यांनी सांगितले.