बाजूलाच काढून टाकली जाते जलपर्णी
पुणे – उन्हाळ्यापूर्वी जलस्त्रोतांमधील जलपर्णी बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असताना महापालिका प्रशासनाने आचारसंहितेचे कारण पुढे करून जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले नाही. मात्र, पालकमंत्र्यांनी मुंढवा जॅकवेल येथे सोमवारी पाहणी केल्यानंतर तेथील जलपर्णी पाहून आदेश दिले. त्यानंतर प्रशासनाने हालचाली करून ही जलपर्णी काढण्याच्या कामाला मंगळवारपासून सुरुवात केली. मात्र, जलस्त्रोतांमधून काढलेली जलपर्णी तेथेच बाजूला टाकली जात असल्याने पावसाळ्यात ती पुन्हा जलप्रवाहात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहराचे नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये मिसळणाऱ्या कचऱ्यामुळे आणि राडारोड्यामुळे त्यांना गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच मुठा आणि मुळानदींमध्ये मोठ्याप्रमाणात जलपर्णी पसरल्याने जलस्त्रोतांमधील प्रदूषणात भरच पडली आहे. संगम पुलापासून पुढे मांजरीपर्यंतही जागोजागी मोठ्या प्रमाणात नदीने जलपर्णीची पांघरलेली आहे. याचबरोबर कात्रज आणि पाषाण तलाव आणि रामनदी तलावातही मोठ्या प्रमाणात जलपर्णी अच्छादलेली आहे.
दरवर्षी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही जलपर्णी काढण्याचे काम केले जाते. मात्र, या वर्षापासून हे काम महापालिकेच्या वाहन विभागाकडे दिले जाणार होते. मात्र, पहिल्याच निविदा प्रक्रियेवेळी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की आणि बरेच रामायण झाल्यानंतर आणि नगरसेवकाला अटक झाल्याचे प्रकरण घडल्यानंतर हे काम पुन्हा आरोग्य विभागाकडे देण्यात आले. जलपर्णी काढण्याचे आणि त्याच्यावर औषध फवारण्याचे काम उन्हाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते. मात्र, मे महिना उजाडला तरीही जलस्त्रोतांमधील जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले नाही. यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करण्यात आले.
वेगात केले जाणार काम
मुंढवा जॅकवेलजवळील बंधाऱ्याजवळ जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी 40 कर्मचारी, 2 जेसीबी, 2 स्पायडरमॅन, मलेरिया सर्व्हेअलन्स निरीक्षक, 2 वैद्यकीय अधिकारी आणि 2 बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. जलपर्णी काढण्याचे आणि औषध फवारणी करण्याचे काम वेगाने केले जाणार असल्याचे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले आहे.
काढलेली जलपर्णी पुन्हा प्रवाहात वाहून जाण्याची शक्यता
नदीच्या जलप्रवाहातून बाहेर काढलेली जलपर्णी तेथेच बाजूला टाकली जाते किंवा पाण्याच्या प्रवाहात पुढे ढकलून दिली जाते. पाण्याच्या बाजूला काढून टाकलेली जलपर्णी आता उन्हामुळे वाळून जाईल. मात्र, पावसाळ्यामध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे ती वाळलेली जलपर्णी पुन्हा नदीच्या प्रवाहात वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो राडारोडा उचलून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.